मुंबई : शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांकडे लक्ष द्या; राऊतांचा भाजपवर हल्ला

मुंबई: काश्मिरी पंडितांच्या मुद्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही जम्मू-काश्मिरच्या परिस्थितीत जराशीही सुधारणा झाली नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. तसेच राज्यसभा निवडणूकीवरुनही त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने निवडणुकीत घोडेबाजार आणला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

काश्मिरी पंडीतांना शोधून मारलं जात आहे. हे जर कोणत्या दुसऱ्या सरकारच्या राज्यात घडलं असतं तर भाजपने हिंदुत्वाच्या नावावर पुर्ण देशात गोंधळ घातला असता अशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे. तसेच शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांकडे लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला आणि भाजपला दिला आहे. 

पुढे राऊत म्हणाले की, केंद्रात तुमचं सरकार आहे, तुमचे गृहमंत्री, तुमचे पंतप्रधान आहे तरीही काश्मिरमधील आमचे बांधव तिकडे मरत आहेत, पलायन करत आहेत हे ठिक नाही. भाजपने काश्मिर फाईल चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधानांच्या, गृहमंत्र्यांच्या कृपेने दिग्दर्शकाने ४००-५०० कोटी रुपये कमवले. पण आताच्या परिस्थितीचं काय? आताच्या परिस्थितीवर काश्मिर फाईल्स २ बनवला गेला पाहिजे असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. मोहन भागवंतांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांकडे लक्ष द्या असं म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.

एकीकडे राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ फडणवीसांना भेटायला गेले आहेत तर दुसरीकडे राऊतांनी भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला आहे. राऊत म्हणाले की, आधी जे महाराष्ट्राचा राजकीय वातावरण प्रदूषित होतं, ते या निवडणुकीच्या निमित्ताने अधिक बिघडण्याची शक्यता आहे. घोडेबाजार नावाचा जो शब्द आहे तो अत्यंत वाईट पद्धतीने महाराष्ट्रात सुरू झालेला दिसून येतोय. आमदार विकत घेण्यासाठी हा पैसा कोठून येतो त्याचा तपास ईडीने केला पाहिजे असं राऊत म्हणाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply