Maharashtra Infrastructure : मुंबई–नाशिकचा प्रवास मुंबई–पुण्यासारखा वेगवान होणार; मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, १० हजार कोटींचा मोठा निर्णय

Mumbai : मुंबई आणि नाशिक या दोन शहराचा प्रवास आता मुंबई-पुण्यासारखाच होणार आहे. कारण, कसारा-मनमाड या दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. १३१ किमी लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी १० हजार १५४ कोटींचा खर्च होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि नाशिक या दरम्यान प्रवास वेगात करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत होते. याला आता अखेर वेग आलाय. लवकरच या कामाला सुरूवात होऊ शकते. 

कसारा-मनमाड या रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात यावी, अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. कसारा-इगकपुरी यादरम्यान रेल्वेला मार्गस्थ करताना अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. पण तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज लागणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक आणि मुंबई या दोन शहरातील प्रवास अधिक वेगाने होणार आहे. त्याशिवाय लोकल धावण्याचा मार्गाही मोकळा होईल. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि उत्तर-पूर्व भारत यामधील प्रवासही वेगात होईल, असे सांगितले जातेय.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मनमाड-कसारा यादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजूरी मिळाल्याची माहिती दिली. मुंबई-नाशिक हा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आणि मुंबईला उत्तर भारताशी जोडण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. कसारा घाटातील हा आव्हानात्मक प्रकल्प आहे. मनमाड-कसारा १३१ किमीचा लांबीचा प्रकल्प ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून जातोय.

मनमाड-कसारा १३१ किलोमीटर लांबीचा प्रकल्प पुढील ५ वर्षात सुरू पूर्ण कऱण्याचा प्लान सरकारने आखला आहे. या प्रकल्पात ३ महत्त्वाचे पूल, १६ मोठे पूल, २१८ लहान पूल, ५ रेल्वे उड्डाणपूल, २१ भुयारी मार्ग आणि ५ बोगद्यांचा समावेश आहे. यातील सर्वात मोठा बोगदा हा २४ किमीचा आहे. इगतपुरी-कसारा यादरम्यान घाटातून प्रवास करण्यासाठी रेल्वेला अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. पण भुयारी आणि बोगद्याचे काम झाल्यास या अतिरिक्त बॅकिंगची गरज लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कसारा-मनमाड रेल्वेमार्ग क्षमतेमुळे वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि भारतीय रेल्वेच्या सेवेची विश्वासार्हतादेखील वाढेल. या बहुमार्गी प्रकल्पांचा उद्देश रेल्वेच्या कामात सुसूत्रता आणणे व वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या संकल्पनेशी निगडीत आहेत. या प्रकल्पांमुळे त्या भागात सर्वसमावेशक विकास होईल आणि नागरिक आत्मनिर्भर होतील तसेच रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असे वैष्णव म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *