Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी १६ आणि १७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री विशेष मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक विद्याविहार ते ठाणे दरम्यानच्या ५व्या आणि ६व्या मार्गिकांवर तसेच कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गावरील स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी घेण्यात येणार आहे. या काळात गाड्यांचे नियोजन बदलणार असून काही गाड्या विलंबाने धावतील, तर काहींचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत तपशीलवार प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

विद्याविहार ते ठाणे दरम्यानचा ब्लॉक १६/१७ ऑगस्टच्या मध्यरात्री ००.४० वाजता सुरू होऊन १७ ऑगस्ट रोजी पहाटे ०४.४० वाजेपर्यंत चालणार आहे. यामुळे डाउन मेल व एक्सप्रेस गाड्या ५व्या मार्गाऐवजी जलद मार्गावर वळवल्या जातील. लोकमान्य टिळक टर्मिनस–हटिया एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपुर कुशीनगर एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव एक्सप्रेस या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. तर अप दिशेने धावणाऱ्या शालिमार–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, विशाखपट्टणम–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि आझमगढ–लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्याही उशिराने धावतील.

दरम्यान, कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गावरील महत्त्वाच्या कामाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठीही १६/१७ ऑगस्ट रोजी रात्री ००.३० ते पहाटे ०५.१५ वाजेपर्यंत विशेष वीज व वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक गाड्या उशिराने धावतील. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस–पाटलिपुत्र एक्सप्रेस, सीएसएमटी–अमृतसर एक्सप्रेस, हटिया एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस आणि कुशीनगर एक्सप्रेसचा समावेश आहे. तर अप दिशेने धावणाऱ्या शालिमार–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हावडा–सीएसएमटी मेल, आझमगढ–लोकमान्य टिळक टर्मिनस अति जलद एक्सप्रेस, नांदिग्राम एक्सप्रेस, समरसता एक्सप्रेस आणि अमरावती–सीएसएमटी अति जलद एक्सप्रेस या गाड्यांनाही उशीर होणार आहे.

 

याशिवाय, गोंदिया–सीएसएमटी विदर्भा एक्सप्रेस ४० मिनिटे नियंत्रित ठेवली जाईल. लिंगमपल्ली–सीएसएमटी देवगिरी एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस आणि पंजाब मेल या गाड्यांनाही १५ ते २० मिनिटे विलंब होईल. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा लोकलच्या काही सेवा उशिराने धावतील. १६ ऑगस्ट रोजी रात्री २२.४७ वाजता आणि १७ ऑगस्ट रोजी पहाटे ००.०८ वाजता सुटणाऱ्या गाड्यांवर याचा परिणाम होईल. कसारा येथून सुटणाऱ्या ०३.५१ आणि ०४.५९ च्या लोकल सेवाही उशिराने चालतील.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या ब्लॉक्समुळे दिवसा मुख्य लाईन किंवा हार्बर व ट्रान्स-हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, मेल व एक्सप्रेस गाड्या नियोजनापेक्षा उशिराने धावतील आणि प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.

 

रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे की, या ब्लॉक्सद्वारे रेल्वे पायाभूत सुविधा टिकवून ठेवणे, मार्गिकांची क्षमता वाढविणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा मुख्य उद्देश आहे. वाढत्या प्रवासी भाराला सामोरे जाताना नियमित देखभाल व तांत्रिक कामे वेळोवेळी होणे अत्यावश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *