Mumbai-Goa Highway Accident News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार तर २२ प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचं सत्र सुरूच आहे. भरधाव वेगाने जाणारी शिवशाही बस पलटल्यामुळे तब्बल २२ जण जखमी झाले आहेत, तर अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली आहे.

या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते. दिप्तेश मोरेश्वर टेमघर (३१, रा. अष्टमी, ता. रोहा) असं अपघातात मृत प्रवाशाचं नाव आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पनवेलवरुन महाडकडे निघालेल्या भरधाव वेगाने शिवशाही बसचा कर्नाळा खिंडीत आल्यानंतर अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पेण येथील कल्पेश ठाकूर यांनी अपघातग्रस्तांची मदत केली. जखमींना आपल्या दोन रुग्णवाहिकांमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यास त्यांनी मोठी मदत केली.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply