Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. येत्या २२ सप्टेंबर पासून गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वाॅटर टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचे आणि जेएनपीए कर्मचार्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असा हा प्रवास एक तासांऐवजी केवळ ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

सध्या गेटवे ते जेएनपीए या मार्गावर लाकडी बोटींद्वारे प्रवास केला जातो. मात्र या बोटी जुन्या झाल्याने त्यातून प्रवास करताना सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित होतात. त्याशिवाय प्रवासासाठी लागणारा वेळही किमान एक तास असतो आणि कधीकधी हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे हा प्रवास आणखी लांबतो. या पार्श्वभूमीवर जेएनपीएने आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय शोधत ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ एक तासांवरून फक्त ४० मिनिटांवर येणार आहे.

प्रारंभी या वॉटर टॅक्सी परदेशात तयार करण्याचा विचार होता, मात्र नंतर ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देत त्यांची निर्मिती देशातच करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला हे काम सोपविण्यात आले आणि काही तांत्रिक कारणांमुळे झालेला विलंब संपवून अखेर या बोटी आता सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, मुंबईकरांसाठी ही सेवा एक नवे पर्व ठरणार असल्याचे सांगितले.

प्रथम टप्प्यात दोन ई वॉटर टॅक्सी सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी एक सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असेल. प्रत्येकी २० प्रवाशांची क्षमता असलेल्या या बोटी ताशी प्रवास जलद आणि सोयीस्कर करतील. यासाठी अपेक्षित प्रवासी दरही अगदी परवडणारा म्हणजे सुमारे १०० रुपये असणार आहे. या टॅक्सींच्या देखभाल आणि संचलनाची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुपकडे सोपविण्यात आली आहे.

भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल काझानी यांनी सांगितले की, सध्या जेट्टीवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होऊन पहिल्याच दिवशी प्रवाशांना सेवा मिळेल. पुढील टप्प्यात आणखी चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होईल आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा एक नवा आदर्श निर्माण होईल.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाहतुकीची समस्या ही कायमच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. विशेषतः गेटवे ते जेएनपीए या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करतात. ई वॉटर टॅक्सी सुरु झाल्यास या सर्वांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ होईल. प्रवाशांसोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही या सेवेला मोठी मागणी राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अखेर मुंबईकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून, २२ सप्टेंबरनंतर समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही नवी ई वॉटर टॅक्सी एक वेगळा आणि आधुनिक अनुभव ठरणार आहे.

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *