Job Offer : परदेशात नोकरी मिळवण्याच्या स्वप्नातून फसवणूक, पालघरच्या तरुणाची व्हिडीओद्वारे मदतीची विनंती

Job Offer : परदेशात चांगल्या भविष्याच्या शोधात निघालेल्या एका तरुणाचं स्वप्न फसवणुकीच्या जाळ्यात अडकून उद्धवस्त झाल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातून समोर आली आहे. बच्चू मिया चाळ, पालघर येथे राहणारा उमेश किसन धोडी या तरुणाला युरोपमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अल्बानिया या देशात पाठवण्यात आले. परंतु तेथे पोहोचल्यावर उमेशच्या हातात काहीच उरले नाही. ना ठोस नोकरी, ना सुविधा, ना संरक्षण. सध्या तो तिथे अडचणीत असून त्याने व्हिडीओद्वारे मदतीची विनंती केली आहे.

उमेशने सांगितले की, वडोदरा येथील IOR नावाच्या कंपनीच्या माध्यमातून त्याला अल्बानियातील Amec Solular Group या कंपनीमध्ये नोकरीचे आमिष देण्यात आले. नोकरीसाठी लागणारी कागदपत्रं, प्रवासाची तिकिटं आणि औपचारिक बाबी पूर्ण करून तो युरोपला पोहोचला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं भासत होतं. पण कंपनीकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा न दिल्यामुळे उमेशने विरोध केला. त्याने विरोध केल्याने त्याला मोठा फटका बसला. त्याला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आलं.

उमेश याला परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवणारा एजंट रफिक घाची हा आहे. या एजंटने उमेशकडून आर्थिक व्यवहार करून त्याला "चांगली नोकरी" असल्याचे सांगून पाठवले. प्रत्यक्षात मात्र, उमेशने ज्या गोष्टींची अपेक्षा केली होती, त्यापैकी एकही गोष्ट प्रत्यक्षात आली नाही. सध्या तो अल्बानियामध्ये अन्न, निवारा आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहे.

ही घटना केवळ उमेशपुरती मर्यादित नसून, परदेशात नोकरीच्या मोहात अडकणाऱ्या असंख्य तरुणांसाठी इशारा देणारी आहे. एजंटकडून दिल्या जाणाऱ्या माहितीची शहानिशा न करता घेतलेले निर्णय हे अशा फसवणुकीला निमंत्रण देतात. उमेशने मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. उमेशचा व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यात त्याने आपली व्यथा मांडून मदतीची करुण याचना केली आहे.

 

या प्रकरणाची दखल घेऊन केंद्र सरकार, विशेषतः परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित लक्ष घालावे आणि उमेशला भारतात सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उमेशच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक करत आहेत. या प्रकरणामुळे भविष्यातील अशा घटनांना रोखण्यासाठी एजंट कंपन्यांवर देखरेख आणि नियमबद्ध नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, उमेशच्या घरी चिंतेचं वातावरण आहे. घरच्यांनी सरकार आणि सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केलं आहे. या घटनेनंतर, पालघरमधील अनेक तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही आपले निर्णय पुन्हा एकदा विचारात घेण्यास सुरुवात केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *