IND vs SA, Super 8 : सलग पाचवा सामनाही आपलाच! टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कामगिरी कशी?

Abhishek Sharma Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: @surya_14kumar x account

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत यजमान टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करुन दाखवली. भारताने साखळी फेरीत अजिंक्य राहत विजयी चौकार लगावला. भारताने यूएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या संघांना पराभूत करत आपला दबदबा कायम ठेवला. भारत 4 विजयांसह ए ग्रुपमधून टेबल टॉपर ठरली. आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकायला सज्ज झाली आहे. टीम इंडिया सुपर 8 मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. या निमित्ताने भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20I वर्ल्ड कप आणि एकूणच टी 20I क्रिकेटमध्ये कामगिरी कशी आहे? हे आकड्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

रविवारी टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका सामना

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना असणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहिले आहेत. त्यामुळे रविवारी दोघांपैकी एका संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागणार हे निश्चित आहे. अशात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 मोहिमेची सुरुवात विजयाने करुन सलग पाचवा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोघांपैकी सरस कोण?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही आठवी वेळ ठरणार आहे. याआधी झालेल्या 7 पैकी सर्वाधिक सामन्यांत टीम इंडिया वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. भारताने दक्षिण आफ्रिकेवर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 2 सामनेच जिंकता आले आहेत.

दोन्ही संघ 2024 फायनलनंतर आमनेसामने

भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ याआधी 2024 च्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने सनसनाटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता.

टीम इंडिया अहमदाबादमध्येही अजिंक्य

दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही अजिंक्य आहे. उभयसंघात या स्टेडियममध्ये एकमेव टी 20I सामना खेळवण्यात आला आहे. भारताने 2025 साली या मैदानात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी सहज विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिकेला भारताने विजयासाठी दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना 201 पर्यंतच मजल मारता आली होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुपर 8 फेरीत उभयसंघात हायस्कोरिंग मॅच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *