IND vs PAK मॅचवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास दोघांपैकी कुणाला फायदा? जाणून घ्या

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ साखळी फेरीतील आपला तिसरा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. मात्र पाकिस्तानला भारतात प्रवेश नाही. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यासाठी सहयजमान असलेल्या श्रीलंकेत जावं लागलं आहे. टीम इंडिया शनिवारी पहाटे श्रीलंकेत दाखल झाली. उभयसंघातील सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.

दोन्ही संघ या स्पर्धेत अजिंक्य आहेत. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. मात्र या सामन्यादरम्यान पावसाची बॅटिंगही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामन्यातील काही वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना  या पावसामुळे रद्द झाला तर दोघांपैकी कोणत्या संघाला फायदा होणार? हे जाणून घेऊयात.

हवामान कसं असेल?

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान पाऊस होण्याचा अंदाज आहे. दिवसा पाऊस होण्याची 65 टक्के शक्यता आहे. तसेच कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये दुपारी ढगाळ वातावरण असेल. तसेच दुपारनंतर पावसाची शक्यता कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 7 पर्यंत पावसाची शक्यता 50 टक्के आहे. त्यामुळे पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड होणार असं चित्र पहायला मिळत आहे.

सामना रद्द झाल्यास काय?

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 5-5 गुण होतील. दोन्ही संघांना तसा मोठा फरक पडणार नाही. मात्र दोन्ही संघांना सुपर 8 साठी साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल. दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. भारत आणि पाकिस्तानने 2 पैकी 2 सामने जिंकलेत. मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.

भारत-पाकिस्तानसमोर कुणाचं आव्हान?

दरम्यान भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांसमोर त्यांच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात असोसिएट टीमचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया नेदरलँड्स तर पाकिस्तान नामिबिया विरुद्ध आपला शेवटचा साखळी फेरीतील सामना खेळणार आहे. त्यामुळे पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तरी फरक पडणार नाही. तसेच या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूदही नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *