Dhule News : शेतात गहू काढताना अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, धुळ्यातील मन सुन्न करणारी घटना

Dhule Farmer Death : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. धुळ्यात शेतात गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने 48 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

शेतात गहू काढत असणाऱ्या 48 वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, सोबतच शेतात काम करणारी 60 वर्षीय महिला सुदैवाने बचावली आहे. परंतु महिला देखील या घटनेत जखमी झाली असून महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील ही दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर नागराज मोरे असे 48 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना संध्याकाळच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला.

यावेळी ज्ञानेश्वर मोरे हे आपल्या वृद्ध आत्त्या आणि इतर मजुरांसोबत त्यांच्या शेतातील गहू काढत होते. पाऊस येईल म्हणून त्यांची लगबग सुरू होती. परंतु तेवढ्यात काळाने घात केला आणि त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत ज्ञानेश्वर मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. 

यावेळी त्यांच्यासोबत शेतात इतर मजूर देखील काम करत होते. त्यांनी ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांच्या वयोवृद्ध आत्या यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु ज्ञानेश्वर मोरे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या वृद्ध महिलेवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मावळात नागरिकांची तारांबळ

मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कांदा व गहू या पिकांचे नुकसान झाले असून सतत पडणाऱ्या पावसाने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. कालपासून आंदर मावळ, तळेगांव, देहूरोड, शेलारवाडी परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झालीये. दिवसा उन आणि रात्री पाऊस त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.

सिंधुदुर्गमध्ये अवकाळी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव परीसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. सांयकाळी सह्याद्रीलगत असलेल्या माणगाव खोऱ्यातील काही गावात व कणकवलीतील फोंडाघाट परीसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि गारांचा मुसळधार पाऊस यामुळे नागरींकाची चांगलीच तारांबळ उडाली. गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा परीणाम आंबा व काजू पिकावर होण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply