BMC Election: मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुतीला यश मिळणार की ठाकरे बंधूंचा करिश्मा चालणार?

BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे केवळ मुंबईकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही सत्तेसाठी नेहमीच मोठा गड मानली जाते. मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेना पक्षाचे मुंबई महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. यातील २० वर्षे भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या सत्तेचा शिवसेनेसोबत लाभ घेतला.

मात्र २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यातील निकृष्ट वाढल्यानंतर स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्यात आली. ही निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेना ८४ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपाने तब्बल ८२ जागा जिंकत प्रचंड वाढ नोंदवली होती. काँग्रेसला ३१, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, समाजवादी पक्षाला ६ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) ७ जागा मिळाल्या होत्या. अपक्ष आणि इतर लहान पक्षांनाही काही जागा मिळाल्या होत्या.

गेल्या ७ वर्षांत महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणात प्रचंड उलथापालत होत मोठे बदल झालेत. मराठी माणसाचा मुद्दा घेऊन उदयास आलेल्या शिवसेना पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन तुकड्यांत विभाजन झाले. काँग्रेस मात्र मुंबईत आपली पारंपरिक पायाभरणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे २०२५ मधील निवडणुकीतले गणित खूप गुंतागुंतीचे बनले आहे.

युती-आघाडीबाबत मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. भाजप आणि शिंदे गटाची युती जवळपास निश्चित आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून भाजपावर दबाव तंत्र टाकण्याचे काम सुरू असून समसमान जागा कशा लढवल्या जातील यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटासह महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मुंबईमधील मराठी माणसांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत असे वाटत आहेत. त्या दृष्टीने अनेक संघटनांकडून तसे प्रयत्न देखील झाले आहेत.

महाराष्ट्रात तिसरी भाषा हिंदी लादण्याचा सरकारचा प्रयत्न झाल्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येत या निर्णयाला विरोध केला आणि परिणामी सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. तेव्हापासून शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एकत्र येईल अशी मुंबईकर मराठी माणसांमध्ये अशा निर्माण झाली आहे. आता मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेतलं जाईल की नाही हे येणाऱ्या काही महिन्यातच स्पष्ट होईल मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे. मागील निवडणुकीत ७ नगरसेवक असलेल्या मनसेने नंतरच्या काळात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध प्रयोग केले. सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला उरलेल्या एका नगरसेवकाने काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

सध्या मुंबईत मनसेचे राजकीय बलस्थान काय आहे याबाबतचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेतच. अलीकडील घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चा रंगू लागली आहे. मराठी मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आणि मनसे मिळून लढले तर परंपरागत शिवसैनिक मतदार पुन्हा एकवटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासोबतच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आता चलविचल देखील सुरू झाली असून ते पुन्हा माघारी फिरण्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.

येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती असा सामना रंगू शकतो किंवा दोन्ही ठाकरे एकत्र येऊन भाजपा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात लढतील असा अंदाज आहे. या युती किंवा आघाडीचा फायदा कोणाला होणार हा मोठा प्रश्न आहे. भाजप-शिंदे गटाकडे सत्ताधारी पक्षाची ताकद आणि संघटनात्मक बळ आहे. ठाकरे गटाला परंपरागत मराठी मतदारांचा भावनिक आधार आहे, तर काँग्रेसकडे अल्पसंख्याक आणि झोपडपट्टी भागातील पकड आहे. मनसेसह जर महाविकास आघाडी मजबूत झाली, तर भाजप-शिंदे युतीसमोर कठीण लढाई उभी राहू शकते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *