मुक्तछंद:अंतिम क्षणी थोडे रंग आणि ‘हायकू’ घेऊन येणारा चंद्र; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये…!

कविता वाचून संपत नाही. आवडलेली कविता वाचून झाल्यावरही मनात रुणझुणत राहते. मग ती कुठल्याही रूपात असो, त्याने फरक पडत नाही. दीर्घकविता असो, वा हायकू! तिला हवं तेवढं मनसोक्त बागडते कविता मनभर. अशाच वाचल्यानंतरही आठवत राहणाऱ्या हायकूंचा एक फार उत्तम संग्रह नुकताच वाचला. तो म्हणजे विजय पाडळकर लिखित हायकूऋतू! ३००हून अधिक हायकू आहेत आणि शिरिष घाटे यांच्या समर्पक रेखाचित्रांनी पुस्तकाला एक छान वेगळेपण आलंय. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक छोटा हायकू आहे. तो काहीसा प्रस्तावनेसारखा भासतो. चंद्र घेऊन आला चकोरासाठी चांदणे माझ्यासाठी हायकू मी वाचलेला हा पहिलाच संग्रह, याआधी हायकू वाचण्यात आले होते, पण एक सबंध संग्रह वाचण्याचा अनुभव वेगळा होता. एखादी दुखरी आठवण उलगडणारा, एखाद्या क्षणाला शब्दात बांधणारा, कुठल्याशा चिरंतन वेदनेचा उच्चार करणारा असे इतके वेगवेगळे भाव असलेले हायकू एकत्र वाचणं आनंददायी होतं. प्रत्येक हायकूचा काही एक ठरीव अर्थ असेल असं नाही. तो ज्याला त्याला वेगळ्या अर्थानं भावणंही शक्य आहे. काही फार आवडलेल्या हायकूंबद्दल सांगायचं तर ‘श्रावणहायकू’पैकी एकात कवी म्हणतात, माहेरनाते नभातल्या पाण्याचे सागरजळाशी किती छान कल्पना मांडलीये! समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि तिच्यामुळे पाऊस पडतो हे विज्ञानात शिकलेलं जलचक्र खरंतर, पण समुद्राच्या जळाला पावसाच्या पाण्याचं माहेर म्हणणं किती गोड आहे! पण ह्याच भागात आणखी एका हायकूमधे एका कदाचित दुखावलेल्या काहीशा कोरड्या मनाचं श्रावणाच्या लोभस असण्यापासूनचं राखलेलं अलिप्तपण येतं. कवी म्हणतात, चिंब बरसातीत कोरडे मन आला गेला श्रावण वाटेचे हायकूमधे ते म्हणतात, पाखराची वाट आकाशी लपून ज्याची त्याने शोधावी खूण केवढं तरी खरंय! ज्याला त्याला आपापल्या वाटा आणि गंतव्य शोधावं तर लागतच पण त्या वाटा जपणारी खूणही शोधावी लागते. पाखराला आकाशातून मनसोक्त विहरताना त्याची त्याची वाट जिथे आहे ती खूण गवसते तशी आपल्यालाही गवसेल फक्त शोधणं हवं! ‘प्रवासाचे हायकू’मधे असलेला एक हायकू मला फार भावला. अदृश्य झाले कॅमेरा शोधताना इंद्रधनुष्य आजकाल आहे तो क्षण अनुभवण्यापेक्षा पुन्हा पाहण्यासाठी कैद करण्याची घाई खूप करतो आपण, नाही का? समोरचं सुंदर इंद्रधनुष्य हे त्या क्षणी मनसोक्त आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी असतं, त्याचे नितांत सुंदर रंग मनात साठवण्यासाठी असतं हे कधी कसे विसरून गेलो आपण मोबाइलची मेमरी भरताना? आणि मग हे वाचून होतं न होतं तोच हा आहे तो क्षण एका क्षणापुरताच वर्तमान आहे हे पुन्हा सांगायला कवी विसरत नाहीत. ते ‘विखुरलेले हायकू’मधे म्हणतात, क्षण बनला एक आठवण क्षणार्धात या इतक्या सुंदर संग्रहाला तितकाच समर्पक समारोप देताना कवी एक छोटीशी प्रार्थना करतात. अंतिम क्षणी मनात उरावे थोडे रंग मागणे एवढेच हे इतकं तरल आणि नेमकं काही कवीच मागू शकतो. एकूणात अनेक छोट्या छोट्या अनुभवांना, भावनांना, दुःखांना, वेदनांना, इच्छांना अवघ्या तीन ओळींमधून आपल्या ओंजळीत ठेवत आपल्या मनात विचारांचे कितीतरी तरंग उठवणाऱ्या हायकूंचा हा एक वाचनीय संग्रह आहे.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *