माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार; महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना खासदाराचं पत्र

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक खासदारांपैकी एक असलेल्या राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. तसेच आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही विचारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना विचारे यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये सध्या सूडबुद्धीने राजकारण केलं जात असून ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस नोंदवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन हे सर्व होत असल्याचा आरोपही विचारे यांनी केला आहे. ‘माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केल्याबाबत’ या विषयाअंतर्गत विचारे यांनी पत्र लिहिले असून पत्राचा संदर्भ यापूर्वी दिलेल्या पत्राशी जोडण्यात आला आहे. “महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या दडपशाहीबाबत आम्ही आपणास दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेले पत्र” असं सुरुवातीला विचारे यांनी पत्रात संदर्भ देताना म्हटलं आहे. विचारेंच्या पत्रातील मजकूर काय आहे पाहूयात…

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी आमच्या शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने आपली भेट घेऊन, महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनाकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना नोटीसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावरे हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला आहे.

अशा उपरोक्त परिस्थितीतच माझा मतदारसंघ ठाणे, नवी मुंबई,मीरा-भाईंदर इथपर्यंत पसरलेला आहे. या महापालिका मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने मला वारंवार रात्री अपरात्री मतदारसंघात जावून नागरीकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. त्यामुळेच मला २०१९ च्या ठाणे लोकसभा निवडणुकीत ७ लाख ४० हतार ९६९ मते मिळाली. परंतु शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटतो.

आश्चर्य म्हणजे शिंदे गटातील ज्यांना शासकीय किंवा राजकीय उच्च पद नाहीत अशांनाही पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. माझ्या अंगरक्षकांच्या संख्येत कपात केल्यामुळे माझ्या व कुटुंबियांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला आहे. दुर्देवाने अशी काही दुर्घटना झाल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री वर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील. तरी कृपया माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात वाढ करावी ही नम्र विनंती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *