पुणे : राहूत ऊस तोडणी मजुरांचा टेम्पो उलटून एक ठार, तीन गंभीर जखमी

पुणे  : राहू येथील बाळोबा मंदिराच्या धोकादायक वळणावर ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटून एक ठार, तीन गंभीर जखमी, तर सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज (ता. २६) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात सुरेश अंबालाल मोरे यांनी यवत पोलिसात खबर दिली आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील अनिल भिल वय पाच वर्ष मुळगाव राहणार राजळे ( ता. जिल्हा नंदुरबार )सध्या राहणार पिंपळगाव (ता.दौंड) अशी मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर अनिल भिवराज भिल वय 34, किरण सुनील ठाकरे वय ४०, राधिका रंगनाथ मोरे वय तीन वर्ष ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यांच्यावर येथील खाजगी रुग्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सात ऊस तोडणी मजुरांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.

पिंपळगाव (ता. दौंड) येथून टेम्पो एम.एच.१२/एच.बी / २८२८ मधून 15 ते 16 ऊस तोडणी कामगार ऊस तोडण्यासाठी राहूकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला. अपघात घडल्यानंतर जोराचा आवाज आला. तत्काळ ग्रामस्थांनी धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उलटलेल्या टेम्पोतून बाहेर काढून तातडीने राहू येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान लहान मुलांचा जोराचा आवाज, नातेवाईकांच्या किरकांळ्या अशा आवाजाने येथील नागरिकांच्या भावना दाटून आल्या.

टेम्पो जोराचा वेग असल्यामुळे पुलाच्या कठाड्याला टेम्पो आदळला दरम्यान टेम्पो चालकाने मद्यप्राशन केल्याची चर्चा घटनास्थळी बोलली जात होती.संबंधित टेम्पो चालक, मालक व ऊस तोडणी मुकादम यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील ऊस तोडणी मजूरांच्या नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेचा अधिक तपास फौजदार अजिंक्य दौंडकर करत आहे.बाळोबा मंदिर चौक आणि कैलास विद्या मंदिर येथील महात्मा फुले चौकात गतिरोधक करण्याची मागणी सरपंच दिलीप देशमुख, उपसरपंच गणेश शिंदे यांनी केली आहे.

दौंडच्या पश्चिम पट्ट्यात आणि राहूबेट परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत गुऱ्हाळे राजरोसपणे चालू आहे. यापूर्वी गुऱ्हाळावर काम करणाऱ्या अनेक ऊस तोडणी कामगार मजुरांना यापुर्वी आपला जीव गमवावा लागलेला आहे. परराज्यातील तसेच मराठवाडा, विदर्भातील अनेक मजूर या ठिकाणी कामाला येत असून त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही. तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीला तीन ते चार ट्रॉली जोडून अनाधिकृत अवैद्य वाहतूक सुरू असतेअन्न औषध प्रशासन विभागाने संबंधित गुऱ्हाळ मालकांवर दंडात्मक कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांच्यासह येथील नागरिकांकडून होत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *