पुणे येथील अगाखान पॅलेसचे पाणी महापालिकेने तोडले

पुणे : राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेसची पाणीपट्टीची थकबाकी पावणे दोन कोटी रुपयांवर पोहोचल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून या वास्तूचा पाणीपुरवठा बंद केला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पैसे पाठ‌वल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, अशी भूमिका पॅलेस व्यवस्थापनाची आहे, तर एक कोटी रुपये थकबाकी भरल्याशिवाय आम्ही पाणी सुरू करणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुण्यातील प्रमुख ऐतिहासिक वास्तूंमध्ये आगाखान पॅलेसचा समावेश आहे. महात्मा गांधी सहा वर्षे राजकैदी म्हणून या वास्तूमध्ये राहिले. गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे स्वीय सहायक महादेव भाई देसाई यांचे याच वास्तूमध्ये निधन झाले. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या वास्तूला बघण्यासाठी देशा-परदेशातील पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी ही वास्तू राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित झाली, तेव्हापासून केंद्र सरकार आणि महापालिका दोघांनीही वास्तूकडे दुर्लक्ष केले आहे. स्मारकाने गेल्या वर्षभरात महापालिकेची पाणीपट्टी भरलेली नाही. थकबाकीची रक्कम आता एक कोटी ७१ लाख ८३० रुपये झाली आहे. त्यामुळे महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा थांबवला. प्रशासकीय वादांमध्ये आगाखान पॅलेसची दुर्दशा झाली आहे. वास्तूच्या आवारातील फुलांची बाग पाण्याअभावी कोमेजली आहे. झाडे वाळली आहेत. पर्यटकांना पिण्यासाठी तर नाहीच, स्वच्छतागृहांसाठीदेखील पाणी उपलब्ध नाही. सुविधेअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. 'पालिकेने घेतली चुकीची भूमिका'

'आगाखान पॅलेसला केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून निधी उपलब्ध होतो. पाण्यासाठी निधी मिळाला न मिळाल्याने थकबाकी वाढली. शहरातील एक प्रमुख स्मारक म्हणून सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी महापालिकेने पाणी तोडून चुकीची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत करावा,' अशी मागणी ॲड. सुनील करपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पाण्याच्या तुटवड्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत, पाण्याअभावी पॅलेसची बाग कोमेजली आहे. पाणी थांबवून प्रशासनाने राष्ट्रीय स्मारकाची मानहानी आणि साक्षात गांधीजींचा अपमान केला आहे, असे स्पष्ट मत करपे यांनी व्यक्त केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *