पुणे : टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा-मोती अश्वांचे प्रस्थान

पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर निघणाऱ्या पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी हिरा-मोती या मानाच्याअश्वद्वयांनी टाळ-मृदंगाच्या गजरात शुक्रवारी अंकली येथून प्रस्थान ठेवले. करोना प्रादुर्भावामु‌ळे गेली दोन वर्षे पालखी सोहळ्यावर बंधने होती. यंदाच्या आषाढी वारीत संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अंकली (जि. बेळगाव) येथून श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळेसरकार यांच्या हिरा आणि मोती या दोन अश्वानी शुक्रवारी ज्येष्ठ शुद्ध एकादशीला श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता या अश्वांची विधीवत पूजा करण्यात आली. दररोज ३० किलोमीटरची मार्गक्रमणा करीत हे अश्व १८ जून रोजी पुण्यात पोहोचणार आहेत. २० जून रोजी हे अश्व आळंदीमध्ये दाखल होणार आहेत.

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात माऊलींच्या अश्वांचे स्वागत करून दर्शन घेतले. वारीच्या काळात कोणालाही करोनाची बाधा होवू नये अशी प्रार्थना माऊली चरणी करण्यात आली. अश्व प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे , हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुंळुजकर, निवृत्ती चव्हाण, राहुल भोर, अजित परकाळे, विजय परकाळे, अतुल वाल्हेकर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *