परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची झडती, बैठ्या पथकाची पूर्णवेळ उपस्थिती; दहावी-बारावी परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी

राज्य मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर सर्व विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार असून, परीक्षेच्या आधी एक तास ते उत्तरपत्रिका जमा होईपर्यंत परीक्षा केंद्रावर महसूल विभागाचे बैठे पथक पूर्णवेळ उपस्थित राहणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे कॉपीमुक्त अभियानाबाबतचे निर्देश दिले. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. शासनाच्या सर्व विभागांनी निवडणूक अभियानाप्रमाणे कॉपीमुक्त अभियान सामूहिकरित्या काम करून यशस्वीरित्या राबवणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी परीक्षा कक्षात प्रवेश प्रवेश करू नये. संवेदनशील परीक्षा केंद्रावर चित्रीकरण करावे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घ्यावी. पोलीस पाटील, कोतवाल, शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करावी. संवेदनशील परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. मूळ गाव आणि कामाचे ठिकाण एकच असल्यास त्या ठिकाणी नियुक्ती देऊ नये. तसेच दररोज बदल करावा. प्रत्येक तालुक्यासाठी एक भरारी पथक नेमावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आकस्मिक भेटी द्याव्यात, तसेच गणित, इंग्रजी आणि विज्ञान परीक्षेसाठी दिवस राखीव ठेवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *