औरंगाबाद : बाप-लेकाने रात्रभर पिकाला पाणी दिले, वडील घरी गेले अन् मुलाने घेतला गळफास

पाचोड : उन्हाळी बाजरीला शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका बावीस वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटनाऔरंगाबाद मधील  कुतुबखेडा (ता.पैठण) येथे शुक्रवारी (ता.१५) सकाळी उघडकीस आली. अभिषेक संतराम भुकेले असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यासंबंधी अधिक माहीती अशी, कुतुबखेडा येथील शेतकरी अभिषेक संतराम भुकेले हा रात्रीचा विद्युत पुरवठा असल्याने तो व त्याचे वडील हे दोघे जण शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले. रात्रभर अभिषेक व त्याच्या वडीलाने शेतातील उन्हाळी बाजरीसह अन्य पिकाला पाणी दिले. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अभिषेकचे वडील आंघोळ करण्यासाठी घरी आले. मात्र थोडावेळ वीज असल्याने अभिषेक तिथेच पाणी देण्यासाठी थांबला. बराच उशीर झाला तरी अभिषेक घरी न आल्याने त्याचे आजोबा शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना अभिषकने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तोच त्यांनी तात्काळ या घटनेची माहीती कुंटुंबियासह गावकरी व पोलिस पाटलांना दिली. माहीती मिळताच ग्रामस्थांसह कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पाचोड (Pachod) पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोच बीट जमादार किशोर शिंदे, फेरोझ बर्डे यांनी कुतुबखेडा येथे धाव घेऊन अभिषेक यास झाडावरून खाली उतरुन उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांने अभिषेक यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर शिंदे, फेरोझ बर्डे आदी पोलिस कर्मचारी करीत आहेत.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *