
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं या मुद्द्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. २०१९ साली अजित पवारांसोबत घडलेल्या प्रकरणाची आठवण करुन देण्याबरोबरच हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘महाराष्ट्रावर वार’ असल्याचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखामधून म्हटलंय. धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय?, असं विचारतानाच शिवसेनेनं एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत’ असा केलाय. त्याचप्रमाणे शिवसेनेनं भाजपाची तुलना ईस्ट इंडिया कंपनीसोबत केलीय.
हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे?
“महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपावाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने कोणत्या छुप्या कारवायांमुळे जिंकली याचा उलगडा आता होत आहे. काल विधान परिषदेत भाजपास दहावी जागा जिंकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांनीच राज्यसभेत भाजपचा धनदांडगा उमेदवार विजयी केला व संजय पवार या शिवसैनिकाचा पराभव घडवून आणला. सोमवारी विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना ‘उचलून’ गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले व भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून ‘ऑपरेशन कमळ’वाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
हा भाजपचा खरा चेहरा आहे
“विधान परिषदेतील दहाव्या जागेचा विजय भाजपने मिळवला तो शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणाऱ्या लोकांना बेइमान करून. या निवडणुकीत काँगेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पाडून भाजपने विजय मिळवला. हंडोरे हे मुंबईतील दीन-दलित समाजाचे नेते आहेत. अशा दीन-दलितास पाडून भाजपने बेइमानांच्या मतांवर विजयोत्सव साजरा केला. त्याच बेइमानांना लगेच गुजरातच्या भूमीवर नेऊन जोरदार सरबराई सुरू झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर व आमशा पाडवी विजयी झाले, पण त्यांच्या अधिकृत मतांतही घाटा दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले, पण मतांची फाटाफूट घडवून भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.
आधी शिवसेनेवर वार करा व मग
“शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी एका तळमळीने भाष्य केले. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालणार नाही. केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूध विकणारी अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणा-भाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेवर वार करा व मग महाराष्ट्रावर घाव घाला, असे राजकारण स्पष्ट दिसते,” असंही अग्रलेखात म्हटलंय.
वेडात दौडणाऱ्या ‘सात’ वीरांचा इतिहास आहे, पण…
“मध्य प्रदेश व राजस्थानात ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करून सरकारे पाडली तोच ‘पॅटर्न’ महाराष्ट्रात वापरायचा व स्वतःला ‘किंग मेकर’ म्हणून ओवाळून घ्यायचे असे तीन अंकी नाटक सुरू झाले आहे. ‘विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मतदान व मतांची फाटाफूट ही तर सुरुवात आहे. आता आम्ही मुंबई जिंकू. मुंबईवर ताबा मिळवू,’ अशी भाषा मंगलप्रभात लोढा यांनी केली, यातच सगळे आले. मुंबईवर ताबा मिळवायचा असेल तर शिवसेना डळमळीत करा, हेच महाराष्ट्रद्रोह्यांचे धोरण आहे. स्वतःला ‘मावळे’ म्हणवून घेणारे त्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या कपट-कारस्थानाचे भागीदार होणार असतील तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत. महाराष्ट्र हे शहाण्यांचे राज्य आहे. शहाणपणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या बाबतीत दोन पावले पुढेच असेल. इतर प्रांतात व कळपांत दीडशहाणे असतील तर महाराष्ट्रात साडेतीन शहाणे असतात. दुसरे असे की, महाराष्ट्रास वेगात व वेडात दौडणाऱ्या ‘सात’ वीरांचा इतिहास आहे. पण ते सात वीर वेडात व वेगात दौडले ते स्वराज्यासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नाही. म्हणूनच त्या वीरांना आजही मानवंदना दिली जाते,” असा उल्लेख या लेखात आहे.
एखाद्या राज्यात सत्ता मिळवता आली नाही म्हणून…
“राजकारण हे वाईट नाही, पण सत्तेची अति महत्त्वाकांक्षा हे जालीम विष ठरते. शिवसेनेने ‘आई-बाप’ बनून असंख्य फाटक्या लोकांना जे दिले ते इतर पक्षांत भल्याभल्या वतनदारांना मिळवता आले नाही. शिवसेनेसाठी छातीचा कोट करून जो मावळा उभा राहिला त्याच्या त्यागातून भगवा झेंडा डौलाने फडकत राहिला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी माती खाल्ली त्यांना महाराष्ट्राची माती व शिवसैनिक माफ करणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या राजकारणासाठी लाजच सोडली. एखाद्या राज्यात सत्ता मिळवता आली नाही म्हणून ते राज्य अस्थिर आणि डळमळीत करायचे, हेच त्यांचे धोरण आहे,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण…
“माणसे फोडायची, फितुरीची बिजे रोवायची, त्या फितुरीचे पिक खडकावरही काढण्यात हे लोक पटाईत, पण देशातील बेरोजगार ‘अग्निवीर’ रस्त्यावर उतरला आहे, कश्मीरात हिंदूंचे हत्याकांड सुरू आहे. लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही योजना व धमक त्यांच्यात दिसत नाही. फितूर निर्माण करायचे व त्या जोरावरच राज्य आणायचे. हीच यांची ‘किंग मेकर्स’ कंपनी. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा हेच केले. ही ईस्ट इंडिया कंपनीही शेवटी गाशा गुंडाळून निघून गेली. विधान परिषद निकालाने त्या ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मा महाराष्ट्रात फडफडताना दिसला. बरे झाले, या निमित्ताने महाराष्ट्र जागा झाला. महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो, हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा. महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
