अहमदनगर : एकाच कारने पाच जणांना दिली धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर ३ गंभीर जखमी

अहमदनगर, राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. उंबरे येथे माळवाडी शिवारात काल, शुक्रवारी रात्री सातेसात वाजता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. यात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. संतापजनक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर कारचालकाने जखमीला मदत न करता कार भरधाव वेगात पळवली आणि यानंतर पुढे दोन दुचाकींना धडक देत त्यावरील चौघांना गंभीर जखमी केले. संजय उर्फ सांडू अर्जुन हिवराळे (वय ३२) आणि कैलास छबुराव पंडित (वय ४५, दोघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी मृतांची नांवे आहेत. तर सुरेश झुगाजी ससाणे, सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड आणि बादशहा शेख (तिघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिशिंगणापूरच्या दिशेने एक कार (एमएच ०९ बीएक्स ३६१६) भरधाव वेगाने चालली होती. मोलमजुरी करुन उपजिविका करणारे सुरेश ससाणे रेस्त्याने पायी चालले होते. त्यांना कारने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेले सुरेश ससाणे यांना मदत न करता या कार चालकाने भरधाव वेगाने कार शनिशिंगणापूरच्या दिशेने नेली. पुढे एक किलोमीटर अंतरावर पोहोचला असता त्याने आणखीन दोन दुचाकींना कारने जोरदार धडक दिली. या दोन दुचाकींवर एकुण चारजण प्रवास करत होते. हे चौघेही बांधकाम मजुरी करणारे कामगार होते.

या अपघाताची माहीती समजल्यानंतर स्थानिक तरुण सुभाष वैरागर, लालासाहेब वैरागर आणि इतरांनी तत्परता दाखवत मदकार्य केले. यावेळी दोन रुग्णवाहिकांमधून सर्वांना नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, या भरधाव कारने पाच २ पुढे एका ओढ्यावरील पुलाला धडक दिली. त्यामुळे, कार तेथेच सोडून कारमधील लोकांनी पलायन केले. या कारमधून तीन जण पळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकांविरुद्ध भरधाव वाहन चालवून रस्ता अपघातास आणि मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply