पुणे : ओला दुष्काळ, पूरस्थितीत सरकारचे अस्तित्वच नाही ; धनंजय मुंडे यांची टीका

पुणे : राज्यात ओला दुष्काळ आणि पूर परिस्थितीचे संकट ओढवले आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह सर्वत्रच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, संकटाच्या काळात राज्यातील सरकारचे अस्तित्वच कोठे दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केली. एका कार्यक्रमासाठी मुंडे पुण्यात आले असता, माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

मुंडे म्हणाले,‘अतिपावसामुळे ऊस पीक वगळता शेतकऱ्यांच्या हाती कोणतेही पीक लागलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारने मंत्री मंडळाचा विस्तार उशिरा केला. पालकमंत्र्यांची घोषणा उशिरा केली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कोणतीही पीक विमा कंपनी शेतकऱ्याला दिलासा द्यायला तयार नाही. ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा.’

गेल्या वर्षी अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्या वेळी महाविकास आघाडीचे सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान दिले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सोयाबीन पिकासाठी पीक विम्याची रक्कम आगाऊ देण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारने ही भूमिका घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही. आज शेतकरी उद्विग्न झाला असून राज्य सरकारने त्यांची परीक्षा पाहू नये, असे आवाहन मुंडे यांनी केले.

या सरकारमधील मंत्री राज्यात कोठेच फिरताना दिसत नाहीत. सध्याच्या संकटाच्या काळात या सरकारचे अस्तित्व राज्यात कोठेच दिसत नाही. विरोधी पक्ष आवाज उठवत आहे, पण सरकारने मदत करायचीच नाही, असे ठरवले आहे. हे सरकार जनतेच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या स्वार्थासाठी अस्तित्वात आले आहे. त्यामुळे त्यांना स्वार्थाव्यतिरिक्त काहीच दिसत नाही, असा आरोप करून धनंजय मुंडे म्हणाले,की दिवाळीसाठी शंभर रुपयात शिधा देण्याची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठी आहे. कोणालाही दिवाळीपूर्वी शंभर रुपयांत शिधा मिळालेला नाही.

भारतीय जनता पक्ष सबंध देशात प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपविण्याचा प्रयत्न अनेकदा केला, मात्र त्यांनी दहा वेळा जन्म घेतला तरीही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येणार नाही, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *