एन. रघुरामन यांचा कॉलम:शेजाऱ्याच्या श्रीमंत जीवनशैलीमुळे तुम्हाला स्वतःला गरीब वाटतं का?

सकाळी फिरणारा एक जण म्हणाला, ‘माझ्या शेजाऱ्याने अक्षय्य तृतीयेला कर्जाशिवाय ऑडी विकत घेतली आहे.’ हे बोलून पूर्ण होईपर्यंत दुसरा म्हणाला, ‘काय सांगतोस? माझ्या शेजाऱ्यानेही काल मर्सिडीज घेतली आहे. काय योगायोग आहे.’ सोमवारी पवई प्रोमेनेडवर मॉर्निंग वॉकदरम्यान अशीच चर्चा सुरू झाली. खरे सांगायचे तर मला नवल वाटले नाही. आदल्या रात्रीच मला अंदाज आला होता की सकाळी कशाबद्दल चर्चा होणार आहे. मुंबईत वीकेंडला गाड्यांच्या खरेदीत वाढ झाल्याची बातमी पसरली होती. नवीन कारच्या नोंदणीत 8% आणि दुचाकींच्या नोंदणीत 37% वाढ झाली होती, कारण खरेदीदार अक्षय्य तृतीयेला डिलिव्हरी मिळण्याची वाट पाहत होते. सुखद सकाळचे ऊन, या शर्यतीसमोर फिके पडत होते. मी गालातल्या गालात हसत त्यांचे बोलणे ऐकत होतो. एका जिज्ञासू व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला विचारले, ‘तुमचा शेजारी एवढा श्रीमंत आहे हे तुम्ही आधी कधीच सांगितले नाही?’ उत्तर आले, ‘तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्याकडे बऱ्यापैकी बँक बॅलन्स होता.’ आता त्यांचा बोलण्याचा टोन थोडा बदलला होता, ज्यामध्ये अभिमान व स्पष्टीकरण दोन्ही होते. मग मला हसताना पाहून त्या व्यक्तीने विचारले, ‘तू का हसतोयस?’ त्यांच्या आवाजात थोडी चिडचिड जाणवत होती. मी शांतपणे म्हणालो, ‘मला वाटते की येत्या काही दिवसांत तुमच्यात काहीतरी बदलेल.’ त्यांनी हे हलक्यात घेत म्हटले, ‘मी 60 वर्षांहून अधिक वयाचा आहे, 30 वर्षांचा नाही, जो शेजाऱ्याच्या यशामुळे असुरक्षित वाटून घेईल.’ वाद घालण्याऐवजी मी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा व फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ फिलाडेल्फियाच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासाचा संदर्भ दिला. 2004 ते 2014 दरम्यान हजारो घरांवर हा अभ्यास करण्यात आला, हे समजून घेण्यासाठी की जेव्हा एखाद्याकडे अचानक पैसा येतो - जसे, लॉटरी जिंकणे किंवा महागडी वस्तू खरेदी करणे - तेव्हा शेजारी काय परिणाम होतो? ते सविस्तर ऐकतील, त्यापूर्वी मी त्यांना एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही वॉकला येण्यापूर्वी तुमच्या कारकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले होते का?’ ते थांबले. होकारही देऊ शकले नाहीत व नकारही देऊ शकले नाहीत. मी म्हणालो, ‘म्हणूनच मी हसत होतो.’ संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत रंजक होते. जेव्हा शेजारचा कुणी लक्झरीवर अधिक खर्च करतो तेव्हा सामाजिक मापदंड बदलतात. लोक त्यात गुंतू लागतात. अर्थशास्त्रज्ञ याला ‘कन्स्पिक्युअस कंझम्पशन’ म्हणतात- म्हणजेच उपयोगासाठी नाही, तर प्रतिष्ठा दाखवण्यासाठी खर्च करणे. विशेष म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बदलत नाही, परंतु त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. याच गोष्टीला 2010 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकच्या आणखी एका अभ्यासाने सिद्ध केले. 80 हजारांहून अधिक प्रौढांवर केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले की लोकांचे जीवनातील समाधान त्यांच्या स्वतःपेक्षा इतरांच्या उत्पन्नाशी होणाऱ्या तुलनेवर अधिक अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचे तर लोक आपल्या संपत्तीवरून नाही, तर इतरांशी तुलना करून स्वतःला श्रीमंत किंवा गरीब मानतात. इथूनच समस्या सुरू होते. एका श्रीमंत शेजाऱ्यामुळे तुम्ही कधीही आर्थिक दबावाखाली येऊ नये. पण बऱ्याचदा असेच घडते. हीच तुलना समाधान नष्ट करते. सत्य अस्वस्थ करणारे आहे, परंतु महत्त्वाचे आहे. पैशासोबतचे निरोगी नाते तुलनेवर नाही, तर आतून निर्माण होते. आपल्या पैशाबद्दल सुरक्षित वाटणारे लोक आपले यश स्वतः ठरवतात. मग ते वैयक्तिक ध्येय साध्य करणे असो किंवा आर्थिक शिस्त पाळणे असो, किंवा ते कुठून कुठपर्यंत पोहोचले आहेत हे समजून घेणे असो. आमचा वॉक संपला आणि चर्चा कार व शेजाऱ्यांवरून दुसऱ्या विषयांवर वळली. पण एक प्रश्न उरला : आपण आपले आयुष्य जगत आहोत, की फक्त ते मोजत आहोत? फंडा असा की - जेव्हा शेजाऱ्याच्या यशामुळे तुम्ही स्वतःला गरीब समजू लागता, तेव्हा समस्या संपत्तीची नाही, तर तुमच्या दृष्टिकोनाची असते.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *