ईडीकडून आठ तासांहून अधिक काळ चौकशीनंतर वर्षा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत”

सक्तवसुली संचालनालयाने (ED) पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शनिवारी (६ ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची ८ तासांहून अधिक काळ कसून चौकशी केली. तसेच त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. ईडीच्या चौकशीनंतर रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना वर्षा राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत,” असं मत वर्षा राऊत यांनी व्यक्त केलं.

वर्षा राऊत म्हणाल्या, “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही. आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. मला पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. मात्र, ईडीने पुन्हा चौकशीला बोलावलं तरी मी चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन.”

“आम्ही संपूर्ण कुटुंब शिवसेनेसोबत आहोत”

संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत म्हणाले, “माझ्या वहिनी वर्षा राऊत यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ईडीने त्यांचा जबाब घेऊन बाहेर सोडलं आहे. जबाबानंतर मी वहिनींशी बोललो त्यावेळी त्या एकच वाक्य म्हणाल्या, ते म्हणजे काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही. आम्ही संपूर्ण कुटुंब शिवसेनेसोबत आहोत.”

“आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जागेवर उद्धव ठाकरे”

“आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जागेवर उद्धव  ठाकरे आहेत. आम्ही उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या स्थानी मानतो. त्यामुळे आम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही. आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला, तरी आम्ही शिवसेनेसोबतच राहणार आहोत,” असंही सुनिल राऊत यांनी म्हटलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply