मुंबई : कामावर हजर न राहणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कारवाई – उर्जामंत्री

मुंबई : राज्यभरात विविध मागण्यांसाठी महावितरण, (MSEDCL) महापारेषणचे कर्मचारीही संपावर आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात संप करणाऱ्या संघटनांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं तसंच आज या संपकऱ्यांना भेटण्याची वेळ दिली होती. मात्र उर्जामंत्र्यांनी वेळ देऊनही संपकरी बैठकीला हजर न राहिल्याने ही बैठक रद्द करण्यात आली असल्याची माहिती नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

तसंच जे संपकरी कर्मचारी कामावरती येणार नाहीत त्यांच्यावरती मेस्मा (Mesma) अंतर्गत कारवाई करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते परिषदेत बोलताना म्हणाले, कालपासून अनेक वीज कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत, मी विश्वास दिला होता कि खाजगीकरण होणार नाही, तरीही संप केला. राज्यात उन्हाळा असताना विजेमागणी वाढली आहे. शेतीला देण्यासाठी विज लागते. तरीही आम्ही ग्राहकांना विजेचा  तुटवडा होऊ देणार नसल्याचं उर्जामंत्री म्हणाले.

'मी बैठकीसाठी आमंत्रण दिलं होतं मात्र, तरीही त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तरीही मी बैठकीसाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत. जे कर्मचारी कामावर हजर राहिले त्यांचे मी आभार मानतो त्यांच्यामुळे लोडशेडिंग (Load shedding) झालं नाही. काल जेव्हा मी बैठकीसाठी बोलावलं तर त्यांनी तयारी दर्शवली मात्र संप मागे घेतला नाही.' तसंच बैठक ही संप मागे घेण्यासाठी होती अन्यथा त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला.

त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय नाही घेतला म्हणून बैठक रद्द केली. मात्र त्यांना माझ्याशी चर्चा करायची असेल तर माझी संपूर्ण तयारी असल्याचही राऊत म्हणाले. सीएम साहेबांनी सकाळीच माझ्याशी चर्चा केली त्यांना संबंधित माहिती देण्यात आली आहे. हा संप राष्ट्रीय होता. मात्र इथे त्यांना चर्चेसाठी दारं उघडी ठेवली आहेत. काल संप मागे घेण्याची तयारी दाखवायला हवी होती. आज तर संप संपणार आहे. आम्ही कोळसा कंपनी सोबत बोलत आहोत. काही ठिकाणी एक दिवस किंवा दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. पण काही ठिकाणी जास्त दिवसांचा आहे. तेव्हा त्याचा बॅलन्स करून कामकाज ठप्प होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं सांगतच केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टींमुळे देशात कोळसा चा प्रश्न उद्भवला असल्याची टीकाही त्यांनी केंद्रावर केली.

मात्र कोणत्याही परिस्थितीत, उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढली असली तरीही वीज पुरवठा खंडीत होणार नाही. मात्र, नागरिकांनीही विज बचत करून वापरावी आणि बिले वेळेत भरावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. शिवाय राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु असताना ग्राहकांना वेठीस धरणार चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही मेस्मा कठोरपणे लावत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *