Nashik : प्रसाद’ की सापळा? महिलांना बेभान करणाऱ्या औषधाचा पर्दाफाश; खरातने काय सांगितलं?



Continue Reading

Pune : पुण्यात धक्कादायक वास्तव! खराडी अग्निशामक केंद्रात सुरक्षा साधनांचा अभाव; जवान धोक्यात



Continue Reading

Mumbai : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट, ४ एप्रिलपर्यंत वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन



Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुले ‘टेक नेक’ वा ‘कॉस्मेटिकोरिक्सिया’च्या समस्येशी झुंजत तर नाहीत ना?



Continue Reading

Mumbai : महाराष्ट्र हवामान अपडेट, 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता!



Continue Reading

Ratnagiri News: कोकणात दुर्दैवी घटना ! आरे-वारे बीचवर पोहताना तरुणाचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश



Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:आयुष्यातील छोट्या-छोट्या आश्चर्यांना हलक्यात घेऊ नका


जर मी तुम्हाला विचारले की तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे तर तुमची यादी किती मोठी असेल? माझी तर खूप मोठी आहे. सर्वात आधी तर मला कावेरी नदीची उणीव भासते. 60 ते 90 च्या दशकादरम्यान ही बाराही महिने वाहणारी नदी असायची, पण आता ती कधी-कधी कोरडी पडते. मला वाटायचे की तामिळनाडूच्या कुंभकोणम येथील माझ्या मूळ गावी ती कायम अशीच दुथडी भरून वाहत राहील. मला तो पोंगलही खूप आठवतो, जो मला दररोज सकाळी 6 वाजता कावेरीच्या काठावर असलेल्या गणपती मंदिरात प्रसाद म्हणून मिळायचा. नदीत पोहून आल्यावर त्या गरम पोंगलची चव दोन कारणांमुळे नेहमीच अद्भुत लागायची- एक, पोहल्यामुळे भूक वाढते आणि दोन, देवाच्या आशीर्वादामुळे त्यांचा प्रसाद आणखी चविष्ट बनतो. मला तो वडा-सांबारही आठवतो, जो लहानपणी रविवारी माझे आजोबा मला खाऊ घालायचे. ‘वेंकटा लॉज’ नावाच्या हॉटेलमध्ये तो एका आण्याला (सहा पैसे) मिळायचा. तिथे वेटर ॲल्युमिनियमची बादली घेऊन उभा असायचा आणि तो कंटाळा न करता हवा तेवढा सांबार वाढायचा. ही माझ्या आयुष्यातील छोटी-छोटी आश्चर्ये होती. मी नेहमीच त्यांना हलक्यात घेतले, पण आज जेव्हा मी जास्तीच्या सांबारच्या छोट्या वाटीसाठी 5 रुपये देतो तेव्हा मला ती बादली व त्या वेटरचा चेहरा आठवतो. त्या हॉटेलने आतापर्यंत आपल्या मूळ मालकांनंतर तीन नवे मालक पाहिले आहेत आणि नव्या मालकाची मुले याचे रूपांतर दुसऱ्या एखाद्या व्यवसायात करू शकतात. याहून मोठ्या पातळीवर मला अरबी समुद्र व किनाऱ्यांची उणीव भासते. समुद्र तिथेच आहे- पण माझे काम मला अनेकदा- अगदी रविवारीही- त्या किनाऱ्यालगतच्या मुंबईपासून दूर घेऊन जाते, जिथे मी राहणे पसंत केले आहे.
लोक आयुष्यातील आश्चर्यांना हलक्यात घेतात. पण ती प्रत्येक रूपात व आकारात आपल्यासमोर येतात. मोठी आश्चर्ये थक्क करणारी असू शकतात, पण छोट्या आश्चर्यांनी आपले आयुष्य बनते. जीवनप्रवासाची दु:खद बाजू ही आहे की या छोट्या-छोट्या आश्चर्यांना हरवण्याची वाईट सवय असते. गावातील छोट्या-छोट्या झोपड्यांचे रस्त्याच्या कडेला प्रवेशद्वार असलेल्या दोन-तीन मजली सिमेंटच्या इमारतींमध्ये रूपांतर झाल्याने ग्रामीण सौंदर्याला आपल्यापासून दूर नेले आहे- नगरपालिकेची बस वेगात गेल्यावर उडणाऱ्या कोंबड्या, सकाळी ताज्या अन्नाच्या प्रतीक्षेत घराबाहेर बसलेली गाय, इकडे-तिकडे सुस्तावलेला अन् पाय ओढत चालणारा व कधी-कधी आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी भुंकणारा एखादा कुत्रा, जाणाऱ्या सायकलींच्या घंटीचा आवाज व बाहेर उभ्या असलेल्या दशकं जुन्या झाडावर किलबिल करणारे पक्षी… नुकतीच जेव्हा माझी मुलगी आली तेव्हा मी तिला आवर्जून नागपुरातील माझ्या शाळेत घेऊन गेलो आणि तिला त्याच बाकावर बसवले, जिथे मी शिकायचो. मी तिला शाळेबाहेर टोपली घेऊन बसलेल्या वृद्ध महिलेकडून बोरे विकत घ्यायला लावली. एका छोट्याशा हनुमान मंदिरासमोर त्याचप्रमाणे उभे राहून प्रार्थना करायला लावली, जशी मी परीक्षा देण्यापूर्वी करायचो. तिला हे सर्व खूप आवडले. भूतकाळातील आठवणी जागवणाऱ्या ठिकाणांबद्दल भावुक होणे आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर जतन करून ठेवणे स्वाभाविक आहे. वयानुसार माझ्यामध्ये ही प्रवृत्ती आणखी गडद होत गेली आहे. त्यामुळेच आयुष्यातील छोट्या-छोट्या आश्चर्यांना ओळखणे व शक्य होईल तितके त्यांना जपून ठेवणे गरजेचे आहे. उदासीन, निनावी जग व असे जग, ज्यामध्ये जीवन व नावीन्याची चमक असेल, जे जगण्याचा आनंद घेता येईल- या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी एकमेव गोष्ट ही की गावाकडच्या शाळांबाहेर बोरे विकणारी वृद्ध महिला केवळ रोख रक्कमच स्वीकारेल. कारण ती मर्यादित नफ्यावर काम करते व डिजिटल पेमेंट घेऊन कमिशन देऊ शकत नाही.


Continue Reading