पुणे: हिंजवडीजवळ पुराचा कहर! जांबे गावात घरांना पाण्याचा वेढा; NDRF ने २५ नागरिकांची केली सुखरूप सुटका

पुणे: मुसळधार पावसामुळे हिंजवडी परिसरालगतच्या जांबे गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पवना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने गावठाणातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला. परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या जवानांनी बोटींच्या मदतीने २५ नागरिकांची सुखरूप सुटका केली.

सलग सुरू असलेल्या पावसामुळे पवना नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासनाने पूरग्रस्त भागात सतर्कता वाढवली आहे. बचाव पथकांकडून परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पूराच्या पाण्यामुळे काही अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, पोलीस आणि ग्रामपंचायत यंत्रणा घटनास्थळी तैनात असून नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हिंजवडी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जलनिकासी व्यवस्थेवर ताण वाढला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी आपत्कालीन पथके तैनात केली आहेत.

हवामान विभागाने पुढील काही तासही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरापासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *