Raigad Fort : शिवजयंतीलाच रायगडाची दुर्दशा! शिवरायांच्या समाधीजवळ तुटलेले बॅरिकेट्स कापडी चिंध्यांनी बांधले

Raigad : राज्यभर तिथीनुसार (6 मार्च) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. मात्र शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजांच्या समाधी परिसरात सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लाकडी बॅरिकेट तुटलेले असून ते दुरुस्त करण्याऐवजी चक्क कापडी चिंध्यांनी बांधून ठेवण्यात आल्याचे उघड झाल्याने शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

समाधी परिसरातील बॅरिकेटची दुरवस्था
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने लाकडी बॅरिकेट उभारण्यात आले आहेत. मात्र यापैकी काही बॅरिकेट तुटले असून त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तुटलेल्या भागाला तात्पुरत्या स्वरूपात कापडी चिंध्यांनी बांधण्यात आल्याचे चित्र शिवजयंतीच्या दिवशीच समोर आले. त्यामुळे शिवभक्तांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

शिवजयंतीला भाविकांची मोठी गर्दी
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त हजारो भाविक, शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर दाखल झाले होते. अशा वेळी महाराजांच्या समाधीस्थळाजवळील बॅरिकेटची ही अवस्था पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत प्रशासनावर टीका केली. शिवरायांच्या राजधानीतच असा निष्काळजीपणाचा प्रकार घडत असल्याने राज्यकर्ते आणि संबंधित यंत्रणा ऐतिहासिक वारशाबाबत किती गंभीर आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विकासकामांवरून यापूर्वीही टीका
किल्ले रायगडावरील विकासकामांबाबत यापूर्वीही अनेकदा निकृष्ट दर्जा आणि नियोजनाच्या अभावाबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. पुरातत्त्व विभाग आणि रायगड प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे आरोपही झाले होते. अशा पार्श्वभूमीवर समाधी परिसरातील बॅरिकेट तुटलेले असताना ते चिंध्यांनी बांधण्याचा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

नेमकी जबाबदारी कुणाची?
हे बॅरिकेट नेमके पुरातत्त्व विभागाने की रायगड प्राधिकरणाने अशा पद्धतीने दुरुस्त केले, याबाबत मात्र अधिकृतरीत्या कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. मात्र शिवजयंतीच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे रायगडावर आलेल्या शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.

वारशाच्या जतनाबाबत प्रश्नचिन्ह
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत पवित्र स्थळ असलेल्या रायगड किल्ल्यावर अशा प्रकारची परिस्थिती दिसून येत असल्याने ऐतिहासिक वारशाच्या जतनाबाबत प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *