पुणे-सातारा मार्गावरील भीषण अपघातात मोडक महाराजांचं निधन; अनुयायांवर शोककळा

पुणे : मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज यांचं अपघाती निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पुणे-सातारा महामार्गावर कार अपघातात त्यांचं निधन झालंय. 

सततच्या प्रवासामुळे कार चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कल्याण मठात शेजारती झाल्यानंतर येथून मोडक महाराज रविवारी (ता.१८) रात्री उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी निघाले होते. त्यापूर्वी ते काशी येथून कल्याण येथे आले होते. पुणे-सातारा रस्त्यावर त्यांची गाडी दुभाजकाला धडकून अपघात झाला. महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवले जाणार आहे.

मोडक महाराज यांनी सुरुवातीला कल्याण येथे मठाची स्थापना केली होती. त्यानंतर मुरुड-जंजिरा, अलिबाग, ठाणे, डोंबिवली व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी डोंगरपाल-डिंगणे, तुळस, कलंबिस्त, आंबोली, उपवडे, झाराप, डिगस, देवगड येथे मठांची स्थापना केली होती. दर महिन्यात ते एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन भक्तांना मार्गदर्शन करत. त्यांचे १४ ठिकाणी मठ कार्यरत होते. आणखी ७ ठिकाणी मठाचे काम सुरू होते. सर्व मठाचे ते संस्थापक असल्याने त्यांनी राज्यभरात भक्तीचा आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा निर्माण केला होता.

देवगड येथे धार्मिक कार्यासाठी ते येत होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व मठांना भेटी देण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांचे भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भक्तगण कल्याण येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. उद्या (ता. २०) दिवसभर त्याठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *