टाटा-एअरबस प्रकल्प वादावर एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्यात काहूर माजवणाऱ्यांनाउत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरं देईल.”

वेदान्त-फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चुकांमुळे हे उद्योग राज्यातून बाहेर जात असल्याचे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नंदूरबारमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच या क्रार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला.

“आज राज्यात टाटा एअरबसवरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरं देईल. भविष्यात या राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच “देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जे प्रकल्प सुरू करण्यात आले होते. त्यांना गेल्या अडीच वर्षांत स्थगिती देण्यात आली होती. ते प्रकल्प आम्ही सत्तेत आल्यानंतर पुन्हा सुरू केले”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला, यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ‘परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही’, अशी टीका  आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “आज राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही जी नुकसान भरपाई दिली आहे. ती आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी नुकसान भरपाई आहे. आमच्या मंत्रीमंडळाने नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली आहे. जे शेतकरी निकषात बसत नव्हते, त्या शेतकऱ्यांनाही आम्ही मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सहा हजार कोटींची नुकसान भरपाई दिली. त्यामुळे त्यांनी आकडे पहावे आणि टीका करावी”

पुढे बोलताना ते म्हणाले, “एकाच दिवसात आम्ही अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. यावर आदित्य ठाकरे का बोलत नाही? कारण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याची वृत्ती बाळासाहेबांनी आम्हाला शिकवली आहे. आम्ही शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच राज्यातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आम्ही उपाय योजना करत आहोत. लवकरच राज्यात मोठी पोलीस भरती होणार आहे. इतर विभागातही ७५ हजार नोकऱ्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे”, असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *