सर्वांगीण विकासासाठी व्यक्ती:अर्थव्यवस्था आणि समाज यांचे संतुलन आवश्यक- बलराज संघई

अनेक व्यक्ती आणि कुटुंबांचा मिळून समाज बनतो. ते परस्पर संबंधित असतात. केवळ एक मोठा समूह असेल तर त्याला समाज म्हणता येणार नाही. परस्पर संबंधांच्या सूत्रामध्ये एकमेकांना बांधले गेल्याने समाज बनतो. फुलांचा ढीग ही असतो आणि माळ ही असते. एका धाग्यामध्ये बांधल्या गेल्यामुळे माळेचे महत्व अधिक असते. फुलांना परस्पर जोडून त्याला माळीचे स्वरूप देणारा धागाच त्या ठिकाणी अधिक महत्त्वाचा असतो. समाजातील सर्व घटकांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून असते. एकमेकावर उपकार करत जगत असताना सह-अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. उद्योगनिष्ठ व्यक्ती काम करणाऱ्या कामगारांना वेतन देतो, त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण करतो. तर तिथे काम करणारे कामगार व्यवसायिकाच्या हिताचे रक्षण करतात. आश्रमामध्ये आचार्य गुरु शिष्यांना ज्ञान देतात, शिष्य ज्ञान प्राप्तीच्या पवित्र उद्देशाने गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून त्यांना संतोष देतात. समाजामध्ये कोणी कोणाला काम देतं, ज्ञान देतं, तर अन्य व्यक्ती त्यांचे कार्य सहज सुलभ करतात. एकंदरीत समाजामधील सर्व घटकांची परस्पर सह अस्तित्वाची शृंखला असते. मुळातच वैयक्तिक आणि सामाजिक जीवन हे मात्र संघर्ष आणि विवादांच्या उद्देशावर आधारित नाही. जीवनात संघर्ष असतो आणि असावा परंतू संघर्षासच मूळ आणि प्रमुख मानले तर तो माणसाला आणि समाजाला हिंसेकडे घेऊन जातो. याउलट परस्पर सहकार्य सह-अस्तित्वाची धारणा मनुष्याला, समाजाला अहिंसेकडे घेऊन जाते आणि तिथे शांती हा उद्देश बनतो. संघर्ष हा वैयक्तिक आणि सामाजिक विकासाचे कारण असला तरी व्यक्ती आणि समाजाचे संतुलित संवर्धन सह अस्तित्व आणि शांतीच्या मार्गानेच होत असते. केवळ आणि केवळ संघर्ष हा विनाशाकडेच नेत असतो. वर्तमान समाजाची स्थिरता आणि जडणघडण ही आर्थिक व्यवस्था आणि विविध स्पर्धात्मक परिस्थितीवर अवलंबून आहे. आज-काल आर्थिक परिस्थिती चांगली तर तो व्यक्ती चांगला आणि कामाचा अशी सामान्य धारणा बनली आहे. अर्थातच यामध्ये व्यक्तीच्या इतर योग्यतेची नक्कीच उपेक्षा होते. म्हणूनच व्यक्ती, आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या तिन्ही तत्त्वांचे परस्पर अपेक्षेने संतुलन साधले तरच सर्वांगीण विकास आणि संवर्धन शांततेच्या उद्देशाकडे नक्कीच नेईल. रुस, चीन आणि त्यासारख्या इतर अनेक देशांमध्ये आर्थिक व्यवस्था आणि समाज व्यवस्था यांच्या बदलांवरती खूप जोर दिला गेला. व्यक्तीला सोडून तेथील व्यवस्था बदलल्या पण व्यक्तीमध्ये परिवर्तन आले नाही. इतक्या मोठ्या नियंत्रणाच्या स्थितीमध्ये देखील तेथे अपराध होतातच. म्हणूनच केवळ व्यवस्था ही परिवर्तनासाठी पुरेशी नसते. त्या सोबतच व्यक्तिगत स्तरावरील हृदय परिवर्तन व सह-अस्तित्व हे मुळात असायला हवेच. आर्थिक परिस्थिती प्रमाणेच जाती भेद, रंग भेद, संप्रदाय भेद अशाही काही गोष्टींनी माणसा माणसांमध्ये, समाजा समाजामध्ये परस्पर भेदभावाच्या खोल दऱ्या निर्माण केल्या. या बाबतीत ज्याच्यामध्ये जितकी अधिक कट्टरता असेल तितकंच अधिक शत्रुत्व आणि द्वेष त्यामध्ये दिसतो. त्यामध्ये मैत्रीच्या तत्वाला आणि भावनेला फारशी जागा उरत नाही. येथेच सह-अस्तित्वाच्या तत्वाला तडा पोहचतो आणि व्यक्ती आणि समाज हिंसेकडे अधिक प्रवृत्त होतो. परस्पर द्वेष आणि हिंसा या प्रवृत्तींचा प्रचार प्रसार करण्यासाठी जितकी मेहनत घ्यावी लागत नाही त्यापेक्षा अधिक कष्ट मैत्री आणि परस्परसह अस्तित्व ही तत्व समजावण्यासाठी घ्यावे लागतात. समाजात सद्भावना रुजवायची तर फार मोठा प्रयत्न करावा लागतो. द्वेष, शत्रुता आणि अशांती हे फारसे समजून सांगावे लागत नसते. तर मैत्री सह-अस्तित्व आणि शांतता हे समजून सांगण्यासाठी मात्र फार मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मुळात समाजाची जडणघडण आणि स्थिरता सह-अस्तित्व आणि अहिंसेच्या आधारावर आहे. प्राण्यां प्रमाणे प्रत्येक मनुष्य जर एकमेकाला संपवण्यासाठी सतत एक दुसऱ्याच्या अंगावर धावून आला असता तर समाज निर्माण झालाच नसता. म्हणूनच असे म्हणावे लागेल समाजाच्या स्थिरतेचा आणि जडण घडणीचा चा मुख्य आधारस्तंभ अहिंसा आणि परस्पर सह-अस्तित्व हाच आहे. " परस्परोपग्रहो जीवानाम् " हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र जैन तीर्थंकर भगवान महावीरांनी समाजाला दिलेले सर्वात उच्चतम तत्त्व आहे. सर्व जीव एकमेकांच्या आधाराने एकमेकावर उपकार करत सह-अस्तित्वाच्या भावनेने जगत असतात. आणि याच अपेक्षेने स्वतः जगावे, जशी अपेक्षा दुसऱ्याकडून असते तसेच आपण त्याच्या ही अपेक्षांना ही पूर्ण करावे. या एका सूत्रामध्येच अहिंसक समाज जीवनाचे आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचे मुख्य बीज सामावलेले आहे. सह-अस्तित्व आणि अहिंसा हाच खरा मूळ शाश्वत धर्म आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा मुख्य आधार स्तंभ आहे. मानव समाजाच्या अस्तित्वालाच जेव्हा विनाशाचा मोठा धोका जाणवतो तेव्हा मात्र सर्वस्व विनाशाच्या भयंकर कल्पनेने अहिंसेची आठवण येते. परंतु यामध्ये एक मोठी चुकीची धारणा झाली. ती अशी की आम्ही अहिंसेला केवळ संकटातून बाहेर पडण्याचा उपाय इतकेच मानले. सर्वकाळ शांतीपूर्ण संतुलित संवर्धनासाठी मात्र सतत अहिंसा आणि सह अस्तित्वाचा विचार झाला पाहिजे आणि ते व्यवहार आणि आचरणात असावे. तरच वर्तमान आणि भविष्यात व्यक्ती समाज आणि विश्वामध्ये समाधान आणि शांतता अस्तित्वात असेल. व्यक्तीच्या सामाजिक संबंधांच्या सीमा ह्या खूप विस्तृत असतात. घरातील व्यक्ती, शेजारी-पाजारी आणि दूरवर असलेल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीसोबत प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संबंध येतोच. समाजातील व्यक्तींच्या परस्पर संबंधांमध्ये जर स्वार्थाची प्रेरणा असेल आणि निस्वार्थ भाव नसतील तेव्हा मात्र स्वतःच्या हिता मध्ये बाधा उत्पन्न झाली तर परिस्थिती परस्पर संबंध तोडण्यापर्यंत येते. परंतु अहिंसा आणि सह अस्तित्वाची भावना समाजातील व्यक्तींमध्ये अत्यंत प्रबळ अशी रुजलेली असेल तर समाजाचे घटक एकमेकाला सहन करत जीवन जगतात. अशा स्थितीत प्रत्येकाला स्वार्थ असूनही त्यांचा आपसामध्ये परस्परांचे अहित करणारा संघर्ष कमीच होतो. जातीभेद, वर्ण भेद, लिंग भेद, वर्ग भेद या गोष्टींना आधार मानत असताना माणसा माणसांमधील दुरावा नक्कीच वाढत गेला, हा दुरावाच परस्पर सह-अस्तित्व आणि सामाजिक एकते साठी अत्यंत घातक बनला. अशा कारणांनीच समाजातील शांतता भंग पावते. या सर्व विविधते पेक्षा उच्च पातळीचे एक तत्व आहे आणि ते म्हणजे माणुसकी, मानवी एकता. मी मनुष्य आहे त्याप्रमाणे समोरील व्यक्ती देखील मनुष्यच आहे. मी समोरच्या व्यक्तीकडून जशा प्रकारच्या व्यवहाराची अपेक्षा करतो तशीच अपेक्षा त्याची देखील आहे. अशा प्रकारच्या उदार चिंतनशील विचारानेच पृथ्वीतलावर मानवाचा शांतीपूर्ण सह अस्तित्वाच्या मार्गाने विकास संभव आहे. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज औद्योगिक वसाहत, छत्रपती संभाजीनगर)

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *