राज्यात साडेसात हजार पदांसाठी होणार पोलीस भरती, औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याची घोषणा केली आहे. ते रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसेच त्यांनी औरंगाबादेतील टी. व्ही. सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आभिवादन केलं आहे.

हा कार्यक्रम सुरू असताना संबंधित परिसरात काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित घोषणाबाजी का होतेय? याबाबत चाचपणी केली असता, संबंधित तरुण पोलीस भरतीची तयारी करणारे असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. तसेच शहरातील टी. व्ही. सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *