डॉ. रामचंद्र साबळे यांचा कॉलम:तापमान वाढ हेच हवामान बदलाचे मुख्य कारण

हवामान बदल ही संज्ञा प्रथम वालॅक स्मित ब्रोकर या अमेरिकन शास्त्रज्ञाने 8 ऑगस्ट 1975 रोजी वापरली. त्यानंतर युनायटेड नेशन्सच्या एन्व्हायरमेंटल प्रोग्राम आणि जगातील हवामान संघटना यांनी जगातील 195 देशांची ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) ही संस्था जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे 1988 साली स्थापन केली. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचा समूह तयार केला. 21 व्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकन शास्त्रज्ञ अल गोर व भारतीय शास्त्रज्ञ राजेंद्र पचोरी यांनी जागतिक तापमान वाढ व त्या अनुषंगाने हवामान बदल होत असल्याचे हवामान विषयक आकडेवारीचा अभ्यास करून सिद्ध केले. पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तापमान वाढत असल्याचे त्यांनी सर्व जगाला दाखवून दिले. अल गोर हे त्यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते. त्यांनी उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळत असून, ते पाणी समुद्रात जाऊन समुद्राची पातळी वाढत आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरील वस्त्यांना धोका निर्माण होत आहे, हे मांडले. पाऊसमानामध्ये बदल होत आहेत. हवामान बदलामुळे काही ठिकाणी चक्रीय वादळांत वाढ, अतिवृष्टी, महापूर आणि बऱ्याच भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असून, ही स्थिती वारंवार येत आहे. जागतिक पर्यावरणात बदल दिसून येत आहेत. वातावरण अधिक उष्ण होत आहे. हवामान बदलाचे गंभीर परिणाम अल गोर या शास्त्रज्ञाने सादरीकरणाद्वारे दाखवून दिले. त्याप्रीत्यर्थ त्यांना व राजेंद्र पचोरी यांना सन 2007 मध्ये विभागून नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनीच खऱ्या अर्थाने जागतिक तापमान वाढ व त्या अनुषंगाने हवामान बदल ही संज्ञा जगभर रूढ केली. दुबई येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या परिषदेत पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तापमान 1.46 अंशांनी वाढल्याचे जाहीर केले. सन 2011 ते 2020 हे दशक अतिउष्ण ठरले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील ‘डेथ व्हॅली’ येथे 56 अंश सेल्सिअस तापमान 24 फेब्रुवारी 2024 रोजी नोंदवले गेले होते. हवामान बदलाची कारणे : औद्योगिक क्रांतीची सुरुवात 1750 ते 1850 या काळात झाली. हाताने वस्तू तयार करण्याऐवजी त्या मशीनद्वारे बनवण्यास सुरुवात झाली. 1765 साली वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. त्यासाठी कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यामुळे कार्बन उत्सर्जन सुरू झाले. वाहतुकीसाठी ट्रक, बस, रेल्वे, कार आणि इतर वाहने पेट्रोल व डिझेलच्या वापराने मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करू लागली. कारखान्यांच्या चिमण्यांमधून धुराचे लोट हवेत सोडले जाऊ लागले. विमानाद्वारे क्लोरोफ्लोरो कार्बन उत्सर्जन वाढले. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामध्ये जर्मन शास्त्रज्ञ फ्रिटझ हबर यांनी अमोनियाचा शोध 1913 मध्ये लावला. त्यांना नोबेल पुरस्काराने 1919 मध्ये सन्मानित केले. अमोनियम सल्फेट व युरियाचा वापर जगभर वाढला, त्यामुळे हवेत नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढले. जनावरांच्या रवंथ करण्याद्वारे मिथेन उत्सर्जन वाढले. कोळशाच्या खाणींतून व तेलविहिरींच्या खोदाईतून मिथेन उत्सर्जन वाढले. एअर कंडिशन्ड इमारतींतून मिथेन उत्सर्जन वाढले. भात व गहू काढणीनंतर धसकटे जाळली जातात, तसेच उसाचे पाचट जाळले जाते, त्यातूनही कार्बन उत्सर्जन वाढत आहे. युद्धामध्ये दारूगोळ्याच्या वापराने कार्बन उत्सर्जन वाढते. हरितगृह वायू : कार्बन उत्सर्जन, नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन, मिथेन उत्सर्जन यालाच पुढे हरितगृह वायू असे संबोधले गेले आहे. हवेत कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण 0.03% वरून 0.04% पर्यंत वाढले आहे. तर मिथेन व नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण प्रत्येकी 0.06% पर्यंत वाढले आहे. ऑर्गन वायूचे प्रमाण 0.93% पर्यंत वाढले असून, ओझोनचे प्रमाण 0.06% वाढले आहे. मात्र, त्याच्या थरास मोठमोठी छिद्रे पडली आहेत. संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येत आहे. 2015 साली पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक तापमान वाढ 1.5 °सेल्सिअसवर रोखण्याचे धोरण निश्चित केले गेले. नैसर्गिक आपत्ती : अधिशेष कार्बन डाय-ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड सूर्याकडून येणारी उष्णता साठवत आहेत. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे, जमिनीचे तसेच समुद्री भागातील पाण्याच्या तापमानात वाढ होत आहे. जेथे तापमान वाढते तेथे हवेचा दाब कमी होतो. हवेच्या कमी दाबाच्या दिशेने जास्त हवेच्या दाबाकडून वारे वाहतात‌. ते मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतात, तिथे ढगनिर्मिती होते व नैसर्गिक आपत्तीत वाढ होते. ढगफुटी, अतिवृष्टी, महापूर यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बचावकार्याची आवश्यकता भासते. काही ठिकाणी भूस्खलन होऊन दळणवळणावर परिणाम होतो, तर काही ठिकाणी डोंगरउतार खचून मानवी वस्त्या नामशेष होत आहेत. सन 2005 मध्ये मुंबई, 2013 मध्ये केदारनाथ, 2014 मध्ये माळीण, 2019-2020 मध्ये केरळ, 2023 मध्ये तामिळनाडू येथे ढगफुटी व अतिवृष्टी होऊन वित्त व मनुष्यहानी झाली. अम्फान, फनी, बिपरजॉय, निसर्ग, मिचॉन्ग यांसारख्या चक्रीय वादळांमुळे बचाव मोहिमा राबवाव्या लागल्या. पाणी टंचाई : हवामान बदलाने मान्सूनच्या आगमनावर व वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. सन 1972, 1986, 2003, 2008, 2013, 2015, 2018 व 2023 ही भीषण दुष्काळी वर्षे महाराष्ट्राने अनुभवली. टँकरने व रेल्वेने पाणीपुरवठा करणे भाग पडले. जगातील तीव्र पाणी टंचाई असणारी शहरे वाढत आहेत. सन 2024 मध्ये भारतातील बेंगळुरू, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन, इजिप्तमधील कैरो, तुर्कीमधील इस्तंबूल, मेक्सिको सिटी, लंडन येथे पाणी टंचाई तीव्र स्वरूप धारण करत असून, सन 2040 पर्यंत जगभर पाणी टंचाई हा मुद्दा गंभीर होईल. तोपर्यंत पृथ्वीची लोकसंख्या आणखी वाढेल. सन 2080 साली पाणी टंचाईचा प्रश्न अतिशय गंभीर बनेल, मानवी स्थलांतर वाढेल आणि शहरे आणखी विस्तारतील. हवामान बदलावर आधारित शेती व्यवस्थापनाची गरज दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सन 2005 सालापासून हवामान बदल वेगाने होत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, ही बाब अतिशय गंभीर वळण घेत आहे. शेतीक्षेत्र उघड्यावर असल्याने त्यावर हवामान बदलाचे परिणाम सर्वाधिक होतात. त्यासाठी एकात्मिक शेती व्यवस्थापनाची गरज आहे.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *