एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम

अनोळखी लोकांशी संवाद साधणे हे एकेकाळी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होते. पण तंत्रज्ञानाने ते संपवले आहे. आवडो वा न आवडो, हे सत्य आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जा. एकमेकांना अभिवादन करण्याऐवजी आपसात भिडतो आणि मग भांडणाच्या भीतीने आपण नजरानजर होऊ न देता “सॉरी’ म्हणतो. गेल्या आठवड्यात मी अशाच परिस्थितीत होतो. सर्व फ्लाइट खूप उशिरा धावत होत्या. विमानतळावरील लाउंजमध्ये लोकांची गर्दी होती. अन्न संपण्यापूर्वी एकदाचे लंच आटोपावे, असा विचार ते करत होते. माझी नजर 2 बाय 2 टेबलकडे गेली. एका व्यक्तीचे आधीच लंच सुरू होते. आता टेबलावर केवळ ग्लास ठेवण्यापुरतीच जागा राहिली होती. दुसऱ्या व्यक्तीच्या प्लेटसाठी तेथे जागाच नव्हती. मग दोन लोकांना एकत्र जेवायचे असेल तर त्यांनी आपली ताटे कुठे ठेवायची, असा प्रश्न होता. पहिल्या व्यक्तीकडे एक ग्लास पाणी, दही आणि एक कप मिठाई असली तरी दुसरा कुणी अनोळखी त्याच टेबलावर बसण्याची हिंमत करणार नाही. कारण येथे जागा कुठे आहे, असा आेरडा खावा लागेल याची इतरांना कल्पना होती. तेवढ्यात मला अशाच एका टेबलावर एक रिकामी खुर्ची दिसली. माझ्या नजरेने तिथे बसलेल्या व्यक्तीचे निरीक्षण केले. माझ्या अनुभवी मनाने तो एक तमिळ आहे. त्याच्याशी तमिळमध्ये बोला, असे सांगितले. कदाचित माझ्या मेंदूने त्याच्या कपाळावरील विभूती पाहून हे सुचवले असावे. इतर कोणत्याही भेसळीविना मी शुद्ध तमिळमध्ये बोलू लागलो. आनंदाने त्यांनी स्वत:ची प्लेट हलवली. कारण टेबलावर त्यांना दुसरा शाकाहारी सापडला. त्या क्षणापासून नवी मुंबईतील नेरूळ येथील भगवान मुरुगन (भगवान गणेशाचा भाऊ) मंदिराचे सचिव के. गणेशन माझे मित्र बनले. मंदिरात येणाऱ्या शेकडो भक्तांशी ते जोडलेले आहेत. त्यामुळे कामे करून घेण्याचे त्यांचे नेटवर्किंग कौशल्य माझ्यासारख्या संगणकावर कथा लिहिणाऱ्यापेक्षा अनेकपटीने जलद व प्रभावी आहे. मी लवकरच प्रकाशित होणाऱ्या एका पुस्तकाचा आढावा वाचत असताना मला या घटनेची आठवण झाली. त्याचे शीर्षक आहे “वन्स अपॉन अ स्ट्रेंजर: द सायन्स ऑफ हाऊ “स्मॉल’ टॉक कॅन ॲड अप टू अ बिग लाइफ.’ हे ससेक्स विद्यापीठातील मानसशास्त्राच्या असोसिएट प्रोफेसर आणि ससेक्स सेंटर फॉर रिसर्च ऑन काइंडनेसच्या संचालक डॉ. गिलियन सँडस्ट्रॉम यांनी लिहिले आहे. त्या छोट्या सामाजिक संवाद आणि कल्याणात तज्ज्ञ आहेत. सँडस्ट्रॉम यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की कॉफी शॉपमध्ये बरिस्तासोबत १० सेकंदांचे संभाषणदेखील आपली समुदायाची भावना मजबूत करू शकते आणि सकारात्मकता वाढवू शकते. त्यांच्या संशोधनाचा सारांश असा आहे की लहान संभाषणे महत्त्वाची आहेत. आज आपल्याला त्यांची गरज आहे. आठवून पाहा. आपण वेळ आणि रस्ता विचारणे कित्येक वर्षांपासून थांबवले आहे. एवढेच नव्हे तर एकमेकांना हसून अभिवादन करणेदेखील थांबवले आहे. हे आपण दुसऱ्या व्यक्तीचा आदर करत नाही म्हणून नाही तर आपण सतत आपल्या फोनवर असतो म्हणून आहे. विमान, ट्रेन, लग्न किंवा सामाजिक मेळाव्यात प्रियजनांना भेटणे आता भूतकाळातील गोष्ट आहे. सँडस्ट्रॉम यांच्या संशोधनातून असेही दिसून आले की, मी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी काय बोलावे, अशी चिंता वाटणाऱ्या विशीतील तरुणांच्या तुलनेत वृद्धांमध्ये चिंता कमी असते. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की अनोळखी किंवा ओळखीच्या लोकांशी लहान, वरवरच्या संभाषणांमुळेही खोल आणि चिरस्थायी सामाजिक संबंध निर्माण होऊ शकतात. 9 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात असा युक्तिवाद केला आहे की अशा लहान संभाषणांमुळे आपला आनंद वाढतो, एकटेपणा कमी होतो आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे लहान संभाषणे निरुपयोगी असतात किंवा वेळेचा अपव्यय असतात ही धारणा खोटी ठरते. फंडा असा की- आठवड्यातून एकदा तुमचा फोन घरी सोडून मॉल, पार्क किंवा सामाजिक ठिकाणी जा. कुणाशी तरी थोडक्यात संभाषण करा. कुणास ठाऊक ते कदाचित तुमच्या समस्या सोडवतील. या संभाषणातून तुमच्या आयुष्यात मोठा बदलही घडून येईल.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *