Maharashtra Weather Alert : राज्यासाठी पुढील ५ दिवस महत्वाचे; मुंबई पुण्यासह या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Weather Updates In Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला फटका दिला. त्यामुळे आता राज्यात मान्सूनचा पाऊस कधी पडेल? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. 

विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट

हवामान विभागाने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट येईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

येत्या ७२ तासांत मान्सून मुंबई येणार

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता लवकरच मान्सूनचं मुंबईत आगमन होणार आहे. यासंबंधी मुंबईच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सून आणखी सक्रीय होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास आता पुढे सरकून आता येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबईत हजेरी लावणार, असंही हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी

दरम्यान, 'बिपरजॉय' चक्रीवादळ हे गुजरातमधून राजस्थान आणि मध्य प्रदेशात पुढे सरकले असले, तरी गुजरातमधील त्याची तीव्रता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून विविध जिल्ह्यांत सुसाट वारे वाहत आहेत. अर्थात, अजून काही दिवस असेच वारे वाहात राहणार आहेत आणि २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. यामुळे जूनचा शेवटचा आठवडा हा धुवांधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply