Thackeray Alliance : ठाकरेंची युती आकाराला; शिंदेसेनेला फायदा, भाजपची रणनीती बदलली; MDM फॅक्टर ठरणार का निर्णायक?

Thackeray Alliance : ठाकरे बंधूंनी अखेर युतीची घोषणा केली आहे. वरळीतील पंचतारांकित हॉटेलात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीची घोषणा केली. मुंबईचा पुढील महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असं राज ठाकरे यांनी यावेळी अगदी ठासून सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आता मुंबईत ठाकरे विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल.

ठाकरे बंधू सोबत आल्यानं आता भाजपला त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे. ठाकरे बंधू सोबत आल्याचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदेना होऊ शकतो. ठाकरे बंधू आल्यानं परिस्थिती बदलेल, समीकरणं बदलतील आणि त्यामुळे आम्हाला रणनीतीही बदलावी लागेल, ही बाब भाजपचे अनेक नेते खासगीत मान्य करतात.

Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड! आज दुपारी १२ वाजता मोठी घोषणा; ठाकरे बंधूंची युती नेमकी कुठे आणि कशी होणार?

'दुभंगलेली शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद पाहता स्वबळावर लढून मुंबई महापाालिका निवडणूक जिंकता येईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं परिस्थिती बदलली आहे. '२०१७ मध्ये शिवसेना एकसंध असताना निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५० हून अधिक नगरसेवक आता एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवणं भाजपला चालणार नाही,' असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले.

प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. त्यावरुन ठाकरे बंधूंनी रान पेटवलं. अखेर महायुती सरकारला भाषा सक्तीचा जीआर मागे घ्यावा लागला. त्यावेळी ठाकरे बंधूंनी मराठी भाषेचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आणि हाच मुद्दा त्यांना एकत्र घेऊन आला. या मुद्द्याला मराठी जनांचा पाठिंबाही मिळाला होता. त्यामुळे मराठीचा मुद्दा ठाकरे बंधू खुबीनं वापरु शकतात, याची जाणीव भाजपला आहे. 'मराठी माणसा जागा हो, ही तुझ्या अस्तित्त्वाची शेवटची लढाई आहे,' असं भावनिक आवाहन करणारे बॅनर मुंबईभर लागले आहेत.

ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन बॅटिंग सुरु केल्यावर भाजपलाही मराठीच्या पीचवर उतरावं लागलं. भाजपची सत्ता आल्यास मराठी महापौर करु, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांना जाहीर करावी लागली. शिवसेना उबाठाची सत्ता आल्यास खान आडनावाची व्यक्ती महापौर होईल, असं म्हणणाऱ्या भाजपला ठाकरे बंधूंची युती मराठी माणसाच्या मुद्द्यावर घेऊन आली.

मुंबईत मराठी मतांचं प्रमाण २६ टक्के, तर मुस्लिम आणि दलित मतांचं प्रमाण प्रत्येकी ११ टक्के आहे. मराठी, दलित आणि मुस्लिम हा MDM फॅक्टर ४८ टक्क्यांच्या घरात जातो. ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार उद्धवसेनेकडे वळले. त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी ४ जागा लढवत ३ वर बाजी मारली. त्यावेळी ठाकरे काँग्रेस सोबत होते. आता त्यांच्या सोबत काँग्रेस नसली तरी राज यांच्या रुपात मनसेचा मतदार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू अधिकाधिक मराठी मतदारांना आपल्याकडे आणू शकतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व वाढलं आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतांच्या जोडीला अधिकाधिक मराठी मतं मिळवण्यासाठी भाजपला शिंदेसेना महत्त्वाची वाटते.

भाजप विरुद्ध ठाकरे बंधूंच्या लढाईत खरी शिवसेना, बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आमच्या सोबत आहे, हा संदेश लोकांमध्ये जाणं महत्त्वाचं असल्याचं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ठाकरे बंधू मराठी मतांसाठी संपूर्ण ताकद पणाला लावतील. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकायची असल्यास मराठी मतांचं विभाजन भाजपसाठी महत्त्वाचं असेल. अशा परिस्थितीत शिंदेसेनेचं महत्त्व वाढेल. ते अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *