Jammu and Kashmir : काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी; देशभरात संतापाची लाट

Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला असून या वेळी एक पाऊल पुढे जात प्रथमच पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. पहेलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे.

अनुच्छेद ३७० हटविण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात येतो. ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ अशी ओळख असलेल्या राज्यात यंदा प्रथमच देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असताना मंगळवारी पहेलगाम शहरापासून सहा किलोमीटरवरील बैसरन या गवताळ पठारावर अतिरेक्यांनी हा नियोजित हल्ला केला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असताना किमान पाच अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. पर्यटकांना टिपून लक्ष्य करण्यात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला. मात्र मोकळे मैदान असल्यामुळे पर्यटकांना आडोसा घेण्याचीही सवड मिळाली नाही. गोळीबार करून अतिरेकी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिस दाखल झाले. अतिरेक्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणांची पथके चारही दिशांना रवाना करण्यात आली आहेत. बंदी घातलेल्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची हस्तक असलेल्या ‘द रेसिडन्स फ्रंट’ (टीआरएफ) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

UPSC Result 2024 : UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे अव्वल, तर महाराष्ट्रातील अर्चितचाही तिसरा क्रमांक!

बैसरन पठारावर केवळ पायी किंवा खेचरांवरूनच तेथे जाता येते. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी खेचरांवरून जखमींना पक्क्या रस्त्यापर्यंत नेले आणि तेथून रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना पहेलगाम आणि अनंतनागमधील रुग्णालयांत हलविण्यात आले. पंतप्रधानांनी हल्ल्याचा ‘एक्स’ समाजमाध्यमावरून निषेध केला असून दोषींना कडक शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली. तर अब्दुल्ला यांनी हल्लेखोरांचा उल्लेख ‘अमानवी श्वापदे’ असा केला. गेल्या काही वर्षांत नागरिकांवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे ते म्हणाले.

त्यांना (अतिरेक्यांना) माफी नाही! त्यांचे दुष्ट हेतू कधीही सफल होणार नाहीत. दहशतवादविरोधी लढ्याचा आमचा निर्धार अभेद्या आहे आणि तो दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना करतो. पीडितांना सर्व प्रकारची मदत मिळेल, अशी हमी देतो.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

घटनेमुळे मला प्रचंड धक्का बसला आहे. आमच्या पाहुण्यांवर झालेला हल्ला घृणास्पद आहे. हल्ला करणाऱ्या अमानवी श्वापदांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. निर्विवादपणे हा गेल्या काही वर्षांत थेट नागरिकांवर झालेला सर्वात मोठा हल्ला आहे.ओमर अब्दुल्लामुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply