Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक; परभणीत मोजणी रोखली, ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

Shaktipeeth Mahamarg : नागपूर- गोवा असा नव्याने होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांना विरोध केला जात आहे. राज्य सरकारकडून महामार्ग करण्यास हिरवा कंदील मिळाला असून यासाठी मोजणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र यानंतर या महामार्गाला जोरदार विरोध केला जात असून राज्यातील १२ जिल्ह्यातील शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. त्यानुसार आज देखील सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, सांगली जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून परभणीत मात्र महामार्गासाठीची मोजणी थांबविण्यात आली आहे.

शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली, अधिकारी परतले परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील काही गावांमध्ये आज शासनाकडून मोजणी करण्यात येणार होती. मात्र ही मोजणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे न करता अधिकाऱ्यांना परतावे लागले आहे. यानंतर अधिकाऱ्यांचा ताफा इथे आला. ज्यात कृषी विभाग, वनविभाग, भूमी अभिलेख, तहसील, पोलीस आदी विभागाचे अधिकारी मोजणीसाठी आले होते. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्यांचं काही चाललं नाही शेवटी मोजणी न करताच अधिकाऱ्यांना परतावे लागले आहे.

नांदेड- वसमत महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला नांदेड : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मालेगाव येथे नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. रास्ता रोको आंदोलनात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील सहभागी झाले होते. कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यातून हा महामार्ग काढण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील कोल्हापूर प्रमाणेच आमदार खासदारांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजे; असे प्रखर मत शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले.

 

सांगली- कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको सुरू सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा; या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर रस्ता रोको सुरू झाला आहे. महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी व सर्वपक्षीय नेते आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून सांगली- कोल्हापूर बरोबर रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला

सोलापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात देखील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी मोहोळ- पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला आहे. वारीच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय?, दरम्यान या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *