Sanjay Raut : बेळगावमध्ये बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट; संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी तुरूंगातून बाहेर आलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे. कारण, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यांना १ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

बेळगावमध्ये बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, कारस्थान केलं जातंय, मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. माझ्यावर हल्ला करण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे. मात्र, महाराष्ट्र झुकणार नाही मी बेळगावला जाणार, असं संजय राऊतांनी ठामपणे सांगितलं आहे. 

संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेने सीमा बांधवांसाठी ६९ हुतात्मा दिले आहेत. मी बेळगावचा ७० वा हुतात्मा व्हायला तयार आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

'बाळासाहेब ठाकरेंनी सीमा प्रश्नांसाठी तीन महिने तुरुंगवास भोगला होता. शिवसैनिकांनी त्यावेळेला तीन दिवस मुंबई पेटवली होती. त्यामुळे ती धग आमच्या मनात कायम आहे. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक होणार असेल तर मी नक्कीच बेळगावला जाईल', असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यावर आता सत्ताधारी पक्षांकडून सुद्धा विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना कशासाठी अटक केली जाणार असा सवाल उपस्थित केला आहे. 'स्वत: संजय राऊत यांची 'आ बैल मुझे मार' अशा प्रकारची आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते असले आरोप करत आहेत. त्यांना नॅशनल लेव्हलला प्रसिद्धी हवी आहे', असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *