Maharashtra Weather : विदर्भावर अवकाळीचे सावट कायम, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; आज कुठे कसं तापमान?

Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. सध्या राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याचे ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी उकाडा सुरू झाला आहे. राज्यात पुन्हा सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात अकोला येथे सर्वात उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विदर्भामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यातही विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 

नाशिकमध्ये ४ दिवसांच्या उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार आहे. आयएमडीच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. गेले ५ दिवस नाशिकमध्ये उन्हाचा सर्वाधिक चटका जाणवला. आजपासून उष्णतेचा पारा कमी होणार आहे. सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाला. आता दररोज एक अंशाने तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. तरीही नागरिकांनी दुपारच्या वेळेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील तापमानात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच पारा चाळीशी पार गेला असून बुधवारी चिपळूण मधील कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी नागरिकांना घराबाहेर जाणे टाळले त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी कमी होती. कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या अंदाजानुसार कोकण विभागात १३ ते १९ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात वाढ होत असल्याने चिपळूण शहरात पाणी टंचाईमध्ये वाढ होत असून टँकरची मागणी देखील वाढलेली आहे.

 

छत्रपती संभाजी नगर शहरात सूर्य आग ओळखत असल्याची प्रचिती पुन्हा आलेली आहे. बुधवारी दुपारी ४२.६ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. दररोज तापमानात एक अंशाने वाढ होत असल्यामुळे उन्हाळ्यात तापमानाचा पारा पन्नाशी गाठतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. आज सकाळपासून ही तीच स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरात मागील पाच दिवसांपासून शहर आणि परिसरावर सूर्य आग ओकत आहे. चिकलठाणा वेधशाळेने काल कमाल तापमान ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. दरवर्षी एप्रिल अखेर आणि वैशाखाच्या सुरुवाती पूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या १० दिवसांतच गाठल्याने पुढील काळात तापमान अजून वाढणार असल्याने संभाजीनगरकरांची चिंता वाढली आहे.

सध्या नांदेड शहरातील तापमान ४१ अंशांच्या पुढे जाऊ लागले असून, उष्णता वाढली आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. तापमान वाढल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झाला असून तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावल्यानंतर काही प्रमाणात कमी झालेला तापमानाचा पारा दोन दिवसांपासून पुन्हा एकदा वाढू लागला असून, तो आता ४२ अंशांवर पोचला आहे. दुपारची मेहनतीची कामे टाळावीत. अनावश्यक घराबाहेर पडू नये. दुपारी ज्या मुलांची शाळा असेल, त्यांची पालकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *