Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?

Shiv Sena Shinde and Thackeray Factions Unite Over Hindu Cause : कल्याणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी कार्यकर्त्यांसह एकत्र येऊन डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बकरी ईदच्या दिवशी नमाजाच्या वेळी किल्ले दुर्गाडी येथील मंदिर खुले ठेवण्याची मागणी केली. दोन्ही गटांनी स्पष्ट केले की, पक्ष वेगळे असले तरी हिंदू म्हणून एकत्र येऊन त्यांनी ही मागणी लावून धरली आहे.

राज्यभरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळत असला, तरी कल्याणात मात्र ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी आणि शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कार्यकर्त्यांसह एकत्र येऊन डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. ही भेट बकरी ईदनिमित्त किल्ले दुर्गाडी येथे घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाली. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी सांगितले की, पक्ष वेगळे असले तरी हिंदू म्हणून राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी डीसीपी यांच्याकडे किल्ले दुर्गाडी येथे नमाजाच्या वेळी मंदिर खुले ठेवण्याची मागणी केली आहे.

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांची धार्मिक स्थळे आहेत, आणि दोन्ही समाजांनी आपापले हक्क सांगितले आहेत. बकरी ईदनिमित्त दोन्ही धर्मांमध्ये वाद होऊ नये, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना पोलिसांकडून हिंदू बांधवांना दुर्गाडी किल्ल्यावर आरती आणि घंटानाद करण्यासाठी प्रवेशबंदी केली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, ही बंदी झुगारण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली 1986 साली शिवसेनेने घंटानाद आंदोलन सुरू केले. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदनिमित्त कल्याणात शिवसैनिक घंटानाद आंदोलन करतात. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट स्वतंत्रपणे हे आंदोलन करत असले, तरी यंदा दोन्ही गटांनी एकत्र येऊन डीसीपी अतुल झेंडे यांच्याशी चर्चा केली.

कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी अतुल झेंडे यांनी शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी आणि दोन्ही गटांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार भोईर म्हणाले, “बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाज नमाज पठण करत असताना मंदिर प्रवेशावर बंदी असते. गेल्या 35 वर्षांपासून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या निर्णयाच्या विरोधात घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. आम्ही मागणी करतो की, ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी मंदिरात जाण्यास परवानगी द्यावी. हिंदू म्हणून आम्ही एकत्र आलो आहे.” तर ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी म्हणाले, “आम्ही हिंदू म्हणून एकत्र आलो आहोत, पण आंदोलन आम्ही आपापल्या पक्षातर्फे करू. आमची मागणी आहे की, बकरी ईदच्या दिवशी नमाजाच्या वेळी मंदिरही खुले ठेवावे.”  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply