Jejuri : जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला; ग्रामस्थ ठोठावणार उच्च न्यायालयाचे दार

जेजुरी: खंडेरायाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवरील विश्वस्त निवडीचा वाद चिघळला आहे. स्थानिकांना प्राधान्य न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. राजकीय हस्तक्षेप होत असल्याने विश्वस्त मंडळ बरखास्त करा आणि प्राधान्याने स्थानिक जेजुरीकर ग्रामस्थांमधील सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासू व्यक्तींची निवड करा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी निषेध सभेत केली.

रास्ता रोको, निषेध सभा व साखळी उपोषण, असे आंदोलन सुरु झाल्याने निवडीचा वाद चिघळला आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचे आयोजन केले. यावेळी खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, प्रमुख वतनदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष सचिन खोमणे, माजी विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी विश्वस्त संदीप जगताप.

शिवराज झगडे, पंकज निकुडे, सुधीर गोडसे, अविनाश भालेराव, अजिंक्य देशमुख, ॲड. अशोक भोसले, ॲड. मंगेश जेजुरीकर, कृष्णा कुदळे, सुशील राऊत, दिलावर मनेर, राजेंद्र मोरे, नंदू निरगुडे, दिगंबर उबाळे, उमेश जगताप, प्रसाद अत्रे.

अलका शिंदे, गणेश आगलावे, रोहिदास जगताप, नीलेश जगताप, प्रकाश खाडे, मेहबूब पानसरे, बंटी खान, माधव बारभाई, विठ्ठल सोनवणे, प्रशांत लाखे, एन. डी. जगताप आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर मुख्य चौकातून निषेधाच्या घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली व देवसंस्थान कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

जेजुरीच्या खंडेरायाच्या जत्रा यात्रा उत्सव, रूढी परंपरा व धार्मिक विधींचा अभ्यास नसलेल्या व राजकीय वरदहस्त असलेल्या नवनियुक्त विश्वस्त मंडळातील बाहेर गावच्या पाच सदस्यांची निवड रद्द करावी.

पुन्हा निवड प्रक्रिया राबवून ग्रामस्थांना संधी द्यावी किंवा ग्रामस्थांमधील किमान चार सदस्य निमंत्रित म्हणून घ्यावेत, सध्याचे अस्तित्वात आलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासन व्यवस्थेत कारभार सुरू करावा. जोपर्यंत मागण्या मान्य होऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत विश्वस्तांना काम करू द्यायचे नाही, असे ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले.

रात्रीच्या वेळी पदभार स्वीकारला

गुरुवारी (ता. २५) रात्री ग्रामस्थ मंडळाची बैठक संपल्यानंतर व रात्री ९ वाजता खंडेरायाची शेजारती होऊन गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास नवनियुक्त पाच विश्वस्तांनी कार्यालयात दाखल होऊन स्वाक्षरी करत पदभार स्वीकारला.

ग्रामस्थांना ही घटना समजताच त्यांनी भक्तनिवास समोर धाव घेत विश्वस्तांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. देवाच्या सेवेचा पदभार स्वीकारायला रात्रीची वेळ का निवडली? असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

उच्च न्यायालयात दाद मागणार

विश्वस्तांची निवड करणारे धर्मदाय सहआयुक्त हे जिल्हा न्यायाधीश असतात. त्यांना निवड रद्द करण्याचा अधिकार आहे. तसे मागणीचे पत्र त्यांना दिलेले आहे. त्यांच्याकडून ग्रामस्थांची मागणी फेटाळली गेली, तर ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *