Isha Mahashivratri 2026 : महादेवांच्या कृपेने हे स्थान पावन, नेहमी जाणवते दैवी अनुभूती – राजनाथ सिंह

ईशा योग केंद्रातील महाशिवरात्री उत्सवात सद्गुरू व भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘भव्य भारत भूषण पुरस्कार’ सुरू करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक वारसा आणि राष्ट्रीय संरक्षण यांतील सखोल नातेसंबंध अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी रविवारी या सोहळ्यात लाखो साधकांना संबोधित केले. “एकीकडे संकटकाळात आमचे सशस्त्र दल शिवाच्या भावनेने मानवतावादी मदत पुरवतात. तर दुसरीकडे कर्तव्याची हाक आली की ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमा रुद्राच्या तीव्रतेने पार पाडतात,असे ते म्हणाले. आमच्या सैनिकांमधील ही भावना आपल्या संस्कृतीतून, भगवान शिवांच्या प्रेरणेतून येते.” असंही त्यांनी नमूद केलं. “येथील दैवी अनुभूती मला कोणी सांगितल्याविना जाणवते की हे स्थान महादेवांच्या कृपेने पावन झाले आहे.” असं राजनाथ सिंह त्या रात्रीच्या दिव्य ऊर्जेने भारावून म्हणाले.

या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री श्री एल. मुरुगन, पुदुच्चेरीचे गृहमंत्री श्री ए. नमस्सिवायम, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पर्यटन राज्यमंत्री श्री सुरेश गोपी आणि तामिळनाडू विधानसभेचे सदस्य श्री एस. वेलुमणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आध्यात्मिक उत्सवात ग्लॅमरचीही भर पडली. सारा अर्जुन, तनिषा, तमन्ना भाटिया, जुही चावला, सलीम मर्चंट, मौनी रॉय आणि वेंकटेश प्रसाद यांसारख्या सेलिब्रिटींनी ईशा योग केंद्रातील ३२व्या महाशिवरात्री उत्सवात लाखो भाविकांसह सहभाग घेतला. “शंभो”च्या घोषात आणि “गंगा” या थीमवर आधारित या उत्सवात पवित्र गंगेचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संगीत, ध्यान आणि शिवकृपेच्या अखंड अनुभूतीत लाखो लोक प्रत्यक्ष आणि ऑनलाइन सहभागी झाले.

“आदियोगी भविष्याचे आहेत”: सद्गुरू

योगी आणि तत्त्वज्ञ सद्गुरूंनी आदियोगींच्या शाश्वत महत्त्वाबद्दल बोलताना सांगितले, “आदियोगी भूतकाळातील नाहीत; ते भविष्याचे आहेत. कारण त्यांनी दिलेले हे कोणतेही श्रद्धासमूह, तत्त्वज्ञान किंवा विचारसरणी नाही, तर ते मानवकल्याणासाठीची तंत्रे आहेत.” पुढील एक-दोन दशकांत “मानवकल्याणासाठीची तंत्रे जागतिक पातळीवर प्रभावी शक्ती बनावीत. वर पाहू नका, आत पाहा. आतच मार्ग आहे,” असे ते म्हणाले.

भव्य भारताचे शिल्पकारांचा सन्मान

यंदाच्या महाशिवरात्रीत प्रथमच ‘भव्य भारत भूषण’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रांत राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव करण्यासाठी सद्गुरूंनी हा उपक्रम सुरू केला. “राष्ट्र म्हणजे फक्त जमीन नाही; राष्ट्र म्हणजे त्याची माणसं. माणसं प्रेरित आणि कटिबद्ध असतील तरच आपण भव्य भारत घडवू शकतो,” असे त्यांनी सांगितले.

यावर्षी सात मान्यवरांचा गौरव करण्यात आला : विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात श्री नांबी नारायण आणि श्री किरण कुमार; नृत्य क्षेत्रात सौ. अलार्मेल वल्ली; संगीत क्षेत्रात सौ. एन. राजम; इतिहास व संस्कृती क्षेत्रात श्री विक्रम संपत; क्रीडा क्षेत्रात सौ. सायना नेहवाल; तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मधील सेवेसाठी भारतीय सशस्त्र दलांचे प्रतिनिधी – एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (वायुसेना), लेफ्टनंट जनरल ए.व्ही.एस. राठी (सेना) आणि व्हाइस अॅडमिरल आर.व्ही. गोखले (नौदल) यांचा त्यात समावेश होता.

योगेश्वर लिंग महाअभिषेक : ऐतिहासिक अर्पण

प्रथमच सद्गुरूंनी ‘योगेश्वर लिंग महाअभिषेक’ ही गहन आध्यात्मिक प्रक्रिया केली, ज्यामुळे भाविकांना योगेश्वर लिंगाशी आपला संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाली. जगभरातील पाच दशलक्षांहून अधिक लोकांनी या मोफत उपक्रमासाठी नोंदणी केली, ज्यामुळे हा ईशाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जागतिक सहभाग ठरला.

संगीत, ध्यान आणि महामंत्राची रात्र

सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालील ध्यानसत्रे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदित्य गढवी, प्रशांत सोनग्रा, स्वरूप खान, ब्लेझ, हरीश सगाणे, ढोल ताशा पथक, स्वागत राठोड, पृथ्वी गंधर्व, ऐश्वर्या आणि दीपाली तसेच ‘साउंड्स ऑफ ईशा’ या बँडच्या सादरीकरणांनी वातावरण आनंदमय आणि शांततेने भरले. आंतरराष्ट्रीय कलाकार स्झा यांनीही आपल्या कुटुंबासह थोडा नृत्यसहभाग घेतला आणि ईशा योग केंद्रातील ‘सम्यमा’ या आठ दिवसीय मौन साधनेच्या अनुभवाबद्दल सांगितले. मध्यरात्रीच्या ठोक्याला महामंत्राच्या घोषाने संपूर्ण योग केंद्र एकात्म भावनेत निनादले. तसेच रात्रभर भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये हजारो भाविक आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

महाशिवरात्री २०२६ सोहळ्याचे २५ भाषांमध्ये (श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी सांकेतिक भाषेसह) थेट प्रक्षेपण करण्यात आले. २०० हून अधिक दूरदर्शन वाहिन्या आणि डिजिटल माध्यमांद्वारे अंदाजे १५० दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत हा उत्सव पोहोचला. यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक आध्यात्मिक कार्यक्रमांपैकी एक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. यावेळी सद्गुरूंनी इनर इंजिनिअरिंग’ हा मोफत ऑनलाइन कार्यक्रम जाहीर केला. तो 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्वांसाठी उपलब्ध असेल.

कालभैरव प्रतिष्ठापना

याच प्रसंगी सद्गुरूंनी यावर्षाअखेरीस ईशा योग केंद्रात ‘कालभैरव’ प्रतिष्ठापना होणार असल्याची घोषणा केली, जो ईशाच्या आध्यात्मिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचाही महाशिवरात्री उत्सव अध्यात्म, उत्साह आणि संस्कृती यांचा सुंदर संगम ठरला.

[embedded content]



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *