Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Pune : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने पुरंदर तालुक्यातील नीरा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. या वर्षातील ‘जीबीएस’च्या रुग्णाचा पुणे जिल्ह्यातील पहिलाच मृत्यू असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

‘जीबीएस’च्या आजाराने नीरा येथील ५१ वर्षांच्या व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला अशक्तपणा, हात पायाला मुंग्या येणे, हात पायांची हालचाल मंदावणे अशी काही लक्षणे दिसून येत होती. मेंदूच्या तपासण्या केल्यानंतर रुग्णाला ‘जीबीएस’ झाल्याचे निदान झाले. त्यानुसार नीरा येथील खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, रुग्णाला उपचारादरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये सोमवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारादरम्यान रक्तदाब वाढल्याने आणि श्वसनास त्रास झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना प्रकृती स्थिर होत असतानाच गुरुवारी सकाळी रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका आला. ‘जीबीएस’च्या संसर्गामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला.

पुरंदर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी भारती हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाच्या आजाराची सर्व माहिती संकलित केली. दरम्यान, नीरेत आणखी एकाला जीबीएस झाल्याचे निदान झाले. मात्र, योग्य उपचारांमुळे तो बरा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

खासगी आणि इतर पाण्याचे स्त्रोत आता तपासण्याचे; तसेच सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. खासगी रुग्णालयांनी अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास त्याची आरोग्य विभागाला माहिती देण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे नमुने पाठवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. - डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

रुग्णाला 'जीबीएस'चा संसर्ग झाला होता. त्यातही 'जीबीएस'च्या गंभीर प्रकाराचा आजार आल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रक्तदाब वाढला. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला. 'जीबीएस'मुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. -डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल

पुरंदर तालुक्यात एकाच गावात 'जीबीएस'च्या संसर्गाचे दोन रुग्ण आढळले आहे. त्यापैकी एका रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर योग्य वेळी झालेल्या उपचारांमुळे आजार बरा झाला आहे. आजाराच्या संसर्गाची जिल्हा परिषदेने गांभीर्याने दखल घेतली असून, घटनास्थळी पाहणी केली आहे; तसेच आरोग्य यंत्रणेला सर्वेक्षण करण्याबरोबर सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. -चंद्रकांत वाघमारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *