Ajit Pawar : अजितदादांचे विमान आदळल्यावर पायलटने काय म्हटलं? AAIB च्या 22 पानी अहवालात उघडकीस

Mumbai : दृश्यमानता प्रमाणापेक्षा खूपच कमी असल्यामुळे बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, असा प्राथमिक निष्कर्ष हवाई अपघातांचा तपास करणाऱ्या संस्थेने (एएआयबी) काढला आहे.

AAIB चा प्राथमिक अहवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला. या दुर्घटनेत पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास ‘एएआयबी’कडे सोपवण्यात आला होता. अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच शनिवारी या संस्थेने प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला. बारामती येथे धावपट्टीवरील फिकट होत चाललेल्या खुणा आणि धावपट्टीच्या पृष्ठभागावर सैल खडी याकडे बोट दाखवताना ‘एएआयबी’ने नियंत्रण नसलेल्या विमानतळांवर उड्डाणे करणाऱ्या सर्व ऑपरेटरना निर्धारित मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) जारी करावेत, अशी शिफारस केली आहे.

पायलटचे शेवटचे शब्द काय?
‘एएआयबी’ने २२ पानांच्या अहवालात म्हटले आहे, विमानतळाकडे येताना वैमानिकांनी दृश्यमानतेविषयी विचारले होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून ३००० मीटर असल्याचे उत्तर मिळाले. लॅण्डिंगला परवानगी देताना हवा साधारण असल्याचे नियंत्रण कक्षाने म्हटले होते. मात्र, व्हीएफआर विमानासाठी दृश्यमानता प्रमाणापेक्षा कमी होती. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या डाव्या बाजूला विमान जमिनीवर आदळले. त्यावेळी वैमानिकांचे अखेरचे शब्द ‘ओह **... ओह **’ असे होते’.

अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) यांच्या सहकार्याने विमानातील सॉलिड स्टेट कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (एसएससीव्हीआर) डाऊनलोड केला जाईल. सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील (एसएसएफडीआर) डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू असल्याचे ‘एएआयबीने’ स्पष्ट केले आहे.

‘तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर जेव्हा विमान वाहतूक सुरक्षितता वाढविण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करणे आवश्यक आहे असे वाटेल तेव्हा ते सुरक्षा शिफारशी जारी करू शकतात’, असे एएआयबीने म्हटले आहे.

अहवालातील ठळक मुद्दे
- दोन्ही वैमानिकांनी या आधीही बारामती विमानतळापर्यंत प्रवास केला होता. त्यामुळे त्यांना परिसराची, विमानतळाची माहिती होती.
- दोन्ही वैमानिकांनी याआधी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वैमानिक म्हणून भूमिका पार पाडली होती. यामध्ये इतर अनियंत्रित विमानतळांचा समावेश होता. तसेच बारामतीचाही समावेश होता.
- विमानतळावर विंडसॉकशिवाय दिशादर्शनासाठी सुविधा उपलब्ध नाही. या धावपट्टीवर दोन विंडसॉक असून दोन्ही विंडसॉक रनवे २९ च्या बाजूला आहेत. ११ च्या दिशेला एकही विंडसॉक नाही.
- बारामती विमानतळावर विमान बचाव आणि अग्निशमन यंत्रणा नाही. त्यासाठी बारामती महापालिकेकडून मदत घ्यावी लागते.
- रनवे रिकार्पेटिंग ही प्रक्रिया विमानतळ देखभालीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. ही प्रक्रिया बारामती विमानतळावर मार्च २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर ही प्रक्रिया झालेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण धावपट्टीवरील खुणा या पुसट झाल्या होत्या. धावपट्टीवर खडी आढळून आली.
- विमानतळाभोवती सुरक्षा भिंत नाही. सध्याचे कुंपण अपुरे असून संपूर्ण विमानतळाभोवती नाही.
- बारामती विमानतळावर हवामानाशी संबंधित माहिती देणारी सुविधा नाही.
- विमान धावपट्टी ११ वर उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या डाव्या बाजूला नियंत्रण सुटल्याने आदळले.
- गावातील सीसीटीव्ही दृश्यांवरून हे विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उजवीकडे वळल्याचे दिसून येत नाही.
- जमिनीवर आदळण्यापूर्वी उतारावरच्या झाडांवर विमान आदळले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *