Kerala Boat Accident : केरळमधील बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर, PM मोदींना दु:ख

Kerala News: केरळमध्ये रविवारी बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटक बोट उलटली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त करत मदत जाहीर केली.

केरळच्या मलप्पुरममधील तनूर येथील तुवाल्थीराम समुद्रकिनाऱ्याजवळ रविवारी संध्याकाळी बोट उलटल्याची घटना घडली होती. या पर्यटक बोटीमधून 50 जण प्रवास करत होते. अचानक ही बोट उलटली आणि सर्व प्रवासी समुद्रात पडले. ही घटना घडली त्यावेळी 9 जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 7 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी शोधमोहीम सुरु आहे. या घटनेप्रकरणी बोटीच्या मालकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडली त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. सूर्यास्तानंतर बोटीच्या प्रवासावर बंदी असताना देखील ही बोट चालवण्यात आली होती. तसंच या बोटीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना बसवण्यात आले होते. या बोटीला सुरक्षा प्रमाणपत्रही नव्हते. तसंच प्रवाशांना सुरक्षाकवचही देण्यात आले नसल्याची बाब पोलिस तपासातून समोर आली आहे.

दरम्यान, या बोट दुर्घटनेप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत या घटनेप्रकरणी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply