सोलापूर: भाविकांवर काळाचा घाला; सोलापुरात ट्रकवर कार आदळून 5 ठार

सोलापूर: मिरज येथून पंढरीच्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नऊ जण चारचाकीतून अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. चालकाला डुलकी लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर थांबलेल्या ट्रकला चारचाकीने मागून जोरात धडक दिली आहे.

या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हुबळी येथील शितोळे कुटुंबीय मिरज येथील नातेवाईक जाधव यांच्या मिरजेतील घरी गेले होते. रात्री ९ जण इनोव्हा गाडीतून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते दुपारच्या सुमारास अक्कलकोटला निघाले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आली.

दुपारच्या सुमारास महामार्गावर वाहनेही कमी होती. यामुळे इनोव्हा चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही. बाजार समिती दीडशे मीटर अंतरावर असतानाच अलिकडे महामार्गावर एका बाजूला थांबलेल्या ट्रकला इनोव्हाने मागून जोरात धडक दिली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक लगेचच तेथे दाखल झाले. पोलिसही काही वेळात त्याठिकाणी आले आणि त्यांनी जखमींना पहिले बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *