‘वंदे मातरम्’वरुन नव्या वादाला सुरुवात; मुनगंटीवारांच्या आदेशास रझा अकादमीचा विरोध


अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र, मुनगंटीवारांच्या या घोषणेनंतर वाद निर्माण होत आहेत. रझा अकादमीने या घोषणेला विरोध केला आहे. वंदे मातरम् ऐवजी दुसरा शब्द द्यावा, अशी मागणी अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी केली आहे.

रझा अकादमीचा विरोध
आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. वंदे मातरम ऐवजी दुसरा पर्याय द्यावा. असा पर्याय द्यावा की, जो सर्वांना मान्य असेल. याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करुन राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे रझा नूरी म्हणाले.

हॅलो ऐवजी वंदे मारतम् म्हणण्याचा मुनगंटीवारांचा आदेश

मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरू करण्याचा आदेश मुनगंटीवारांनी दिला आहे.

यापूर्वीही वंदे मातरम् वरुन अनेक वाद

वंदे मातरम् वरुन निर्माण झालेला हा वाद नवा नाही. यापूर्वीही या घोषणेवरुन किंवा वाक्यावरुन अनेक वाद झाले आहेत. एमआयएम आणि भाजपा आमदारांमध्ये अधिवेशनात या शब्दावरून अनेकदा वाद झाले आहेत. “इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा,” असं म्हणत भाजपा आमदारांना अधिवेशनात सभागृह बंद पाडलं होतं.

शिंदे गटासमोर प्रश्नचिन्ह

सुधीर मुनगंटीवारांच्या वंदे मातरम् म्हण्याच्या या घोषणेमुळे शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेत पूर्वीपासून ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची परंपरा आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री, आमदार आणि खासदार ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार की ‘वंदे मातरम्’ म्हणणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *