“राहुल गांधींना मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण कसं करणार?” शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटाला सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार? असा सवाल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. “शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल युवराजांना या पापातून मुक्त करण्यासाठी गोमुत्राने अंघोळच घालावी लागेल”, असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले होते. मात्र, यानंतर काही वेळातच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोमूत्र शिंपडून समाधीस्थळाचे शुद्धीकरण केले. हा प्रकार बालिशपणा असल्याची टीका म्हात्रे यांनी केली आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ज्यांना पूर्ण देश ओळखतो त्यांना राहुल गांधी माफीवीर म्हणाले. त्यांना सावरकरांबाबत किती माहिती आहे, याबाबत कल्पना नाही. परंतू सावरकरांबद्दल गांधी जे बोलले, त्याचा आम्ही निषेध करतो”, असं म्हात्रे म्हणाल्या आहेत. “काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना अद्दल घडवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी जोडे मारो आंदोलन केलं. तेच ठाकरे आता ‘भारत जोडो’ यात्रेत जाऊन राहुल गांधींना मिठी मारतात”, अशी टीका म्हात्रे यांनी केली आहे.

सावरकरांकडून देशाविरुद्ध इंग्रजांना मदत- राहुल गांधी

“एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाशिमच्या मालेगावात क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, असा आरोपही त्यांनी केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *