मुंबई : सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांना मिळणार दिलासा, दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस

मुंबई : गेल्या २९ मार्चपासून विदर्भात उष्णतेची लाट होती. अकोला रविवारी देशातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला. त्यापाठोपाठ बुलडाण्यातही उन्हाचा तडाखा जाणवला. पण, आता विदर्भातील काही उष्ण जिल्ह्यांना या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. विदर्भातील उष्ण जिल्ह्यात चार आणि पाच एप्रिलला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

येत्या चार ते पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची  शक्यता आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांना तात्पुरता दिलासा मिळणार असून ४ एप्रिलला अकोला, बुलडाणा, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ५ एप्रिलला अकोला, बुलडाणा, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये जोरदार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी उष्णतेच्या लाटेचा शेवटचा दिवस होता. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४२ अंशाच्या वर पोहोचले होते. अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. अकोल्यात ४४ अंश तापमानाची नोंद झाली असून जगातील सातव्या क्रमांकाचं शहर ठरलं. यापाठोपाठ बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात देखील ४० अंशाच्यावर तापमान होतं. या जिल्ह्यांना आता तात्पुरता दिलासा मिळणार आहे. पण, १५ एप्रिलनंतर आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

आज चार आणि उद्या पाच एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *