मुंबई : संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे!; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षां निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रतििबब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावे इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळय़ा संकल्पना सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरूपात सादर करण्यात याव्यात, असे आदेशही ठाकरे यांनी दिले.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ.अमोल कोल्हे उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण करत, भिमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर तर वढू (बु) येथे सुमारे ४ एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येणार असल्याचे सांगितले. शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखडय़ात स्मारक परिसरात भव्य शिल्प, अ‍ॅम्फीथिएटर, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौर ऊर्जा पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *