मुंबई : देशाच्या सागरीसुरक्षेसाठी पुढील ३६ तास महत्वाचे; जाणून घ्या ‘ऑपरेशन सी व्हिजिल’!

 

.

मुंबई : भारताला तब्बल साडेसातहजार किलोमीटर्सचा किनारा लाभला असून; २६/११ च्या सागरी दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. खरे तर कारगिल युद्धाच्या वेळेस नेमण्यात आलेल्या समितीने सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. मात्र त्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली. त्याही पूर्वी १९९३ साली याच सागरी मार्गाने स्फोटके महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर उतरली आणि साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली…

सागरी सुरक्षेच्या मुद्दा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र देशपातळीवर गांभीर्याने घेतला गेला. सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असावी, देशाच्या किनारपट्टीवर बारकाईने लक्ष ठेवणारी साखळी रडार यंत्रणा असावी, अशा शिफारसी करण्यात आल्या आणि त्याची अमलबजावणीही हळूहळू का होईना, पार पडली. गेल्याच वर्षी या सागरी सुरक्षेच्या एकात्मिक अमलबजावणीसाठी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयन यंत्रणा अस्तित्वात आली असून त्याचे पहिले समन्वयक म्हणून व्हाइस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय देशाच्या सागरी सुरक्षेसाठी संपूर्ण किनारपट्टीवरील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी रडार उभारण्यात आली असून एकमेकांशी जोडत त्यांची साखळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणांद्वारे सर्वत्र करडी नजर ठेवली जाते. शिवाय सागरी सुरक्षेमध्ये सर्व संबंधित तपास यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस, सीमाशुल्क अधिकारी, सीमासुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, मत्स्योत्पादन मंत्रालय, नौवहन मंत्रालय, बंदर व्यवस्थापन, तेल व नैसर्गिक वायू हाताळणी करणाऱ्या यंत्रणा याशिवाय केंद्र आणि राज्यांच्या विविध गुप्तचर यंत्रणा यांचा समावेश आहे. या सर्वांच्या एकत्रिकरणाची चाचपणी करण्यासाठी २०१९ पासून संपूर्ण देशभरात एकाच वेळेस तब्बल साडेसातहजार किलोमीटर्सच्या किनारपट्टीवर ‘सी व्हिजिल’ हे सागरी सुरक्षेचे ऑपरेशन राबविले जाते. यामध्ये पहिल्या दिवशी यंत्रणांची चाचपणी तर दुसऱ्या दिवशी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न असे ऑपरेशनचे स्वरूप असते. यात निळा गट घुसखोरी रोखण्यासाठी तर लाल गट घुसखोरी करण्यासाठी क्रियाशील असतो. तब्बल ३६ तास हे ऑपरेशन सुरू असते. अखेरीस या ऑपरेशनदरम्यान लक्षात आलेल्या त्रुटींचा अभ्यास अहवाल सादर होऊन त्यावर उपाययोजना केल्या जातात.

यंदाचे ऑपरेशन ‘सी व्हिजिल’ उद्या, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. तर १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता ते संपले, अशी माहिती या ऑपरेशनचे प्रमुख रिअर अ‍ॅडमिरल जनक बेवली यांनी दिली. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यासाठीचा सज्जतेचा आदेश जारी झाला आहे. निळ्या गटाचे संपूर्ण देशाचे सागरी सुरक्षा चक्र लाल गट कसे भेदणार याकडे नौदल सामरिक तज्ज्ञांबरोबरच आता संपूर्ण देशाचेही लक्ष लागून राहिले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *